आळंदीपासून हाकेच्या अंतरावर कत्तलखान्याचा प्रस्ताव ; माजी स्थायी समिती सभापती सिमा सावळे यांनी केला प्रशासनाचा निषेध

0
14

पिंपरी-चिंचवड (दि. २९) : पिंपरी-चिंचवडमहानगरपालिकेने नुकताच प्रसिद्ध केलेला प्रारूप सुधारित विकास आराखडा नव्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. मोशी-डुडुळगाव सीमेवर आळंदीपासून हाकेच्या अंतरावर इंद्रायणी नदीजवळ तब्बल ४ एकर जागेवर कत्तलखाना प्रस्तावित करण्यात आल्याने,हिंदुत्ववादी संघटना आणि वारकरी संप्रदायामध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या पवित्र भूमीत अशा प्रस्तावामुळे धार्मिक आणि सांस्कृतिक अस्मितेवरच गदा येत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. माजी स्थायी समिती सभापती आणि माजी नगरसेविका सिमा सावळे यांनी या प्रस्तावावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली असून, प्रशासनाचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. “इंद्रायणी नदी आणि आळंदीसारख्या पवित्र तीर्थ स्थळाजवळ कत्तलखाना प्रस्तावित करून प्रशासनाने संपूर्ण हिंदू समाजाच्या आणि विशेषतः वारकरी संप्रदायाच्या भावना दुखावल्या आहेत,” असे सावळे यांनी नमूद केले. प्रशासनाचा हा निर्णय म्हणजे धार्मिक परंपरेचा आणि स्थानिक संस्कृतीचा अनादर करणारा आहे, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.           

                        प्रशासनाने मोशी येथील सर्वेक्षण क्रमांक ३२५ (स.न. ३२५) च्या जागेवर हा कत्तलखाना प्रस्तावित केला आहे. विशेष म्हणजे, याच स.न.३२५ मध्ये देहू-आळंदी रस्त्यावरील महर्षी वेदव्यास प्रतिष्ठानद्वारा संचलित वेदश्री तपोवनच्या अगदी लगत आरक्षण क्र. ५/२२० अन्वये कत्तलखाना प्रस्तावित करण्यात आला आहे. तसेच कत्तलखान्याला लागूनच आरक्षण क्र. ५/२२१ नुसार सुमारे ४ एकर क्षेत्रावर जनावरांचा दवाखाना देखील प्रस्तावित करण्यात आला आहे. “जनावरांचा दवाखाना आणि कत्तलखाना शेजारी शेजारी प्रस्तावित करणे म्हणजे निव्वळ मूर्खपणा आहे,” असे सिमा सावळे म्हणाल्या. हे नियोजन वैज्ञानिकदृष्ट्या आणि नैतिकदृष्ट्याही चुकीचे असून, प्रशासनाच्या दूरदृष्टीचा अभाव स्पष्टपणे दर्शवते. या प्रस्तावामध्ये प्रशासनाच्या नियोजनशून्यतेचे आणि असंवेदनशीलतेचे दर्शन होत असल्याचा त्यांनी म्हटलं.           

            पवित्र नद्या, धार्मिक तीर्थ स्थळे आणि स्थानिक लोकभावना यांचा विचार न करता अशा प्रकारचा प्रस्ताव आणल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वारकरी आणि समस्त हिंदू समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल प्रशासनाने जाहीर माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. तसेच, प्रशासनाने हा प्रारूप सुधारित विकास आराखडा तातडीने मागे घेण्याची मागणी सिमा सावळे यांनी केली आहे. अन्यथा प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सावळे यांनी दिला.