आम्ही बंड केलेला नाही, उठाव केला आम्हाला बंडखोर म्हणून नका

0
240

मुंबई, दि. ४ (पीसीबी) – शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना सोबत घेऊन एकनाथ शिंदे आणि भाजपने सरकार स्थापन केलं. आज नव्या सरकारने सभागृहात बहुमत सिद्ध केलं. त्यामुळे नव्या सरकारवर शिक्कामोर्तब झालं आहे. नव्या सरकारच्या विश्वासदर्शक ठरावावर एकनाथ शिंदे गटाकडून माजीमंत्री गुलाबराव पाटील यांनी भाषण केलं.यावेळी त्यांनी चौफेर टीका करत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये झालेली कुचंबणा मांडली. त्याचवेळी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना थेट इशारा दिला.

गुलाबराव पाटील म्हणाले की, आम्ही बंड केलेला नाही, उठाव केला आहे. आम्हाला बंडखोर म्हणून नका. आज माझ्या सारख्या माणसाला म्हणतात गुलाबराव तुम्हाला टपरीवर पाठवीन, रिक्षा चालवणारा, चहा विकणारा ज्यांना काही काम नव्हतं त्यांना नेता केलं असू म्हणत आमची खिल्ली उडवली.

अजितदादा म्हणतात, शिवसेना सोडून जातात ते पुन्हा निवडून येत नाही. पण दादा आम्ही शिवसेना सोडली नाही त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, असं सल्ला गलाबराव पाटील यांनी दिला. तसेच आमचा साधा मेंबर फुटला तरी आम्ही विचार करतो. इथं चाळीस आमदार फुटले तरी जाग आली नाही. आम्हाला साहेबांची भेट मिळत नव्हती, अशी खंतही पाटील यांनी व्यक्त केली.

आधीच्या सरकारमध्ये आम्हाला उद्धव ठाकरे यांची भेट मिळत नव्हती. आमचे फोन घेतले जात नव्हते. त्याचवेळी एकनाथ शिंदे विचारायचे कोरोना काळात तुम्हाला किट वाटप करायच का, काय मदत हवी, असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरे यांच्या कामाच्या पद्धतीचा उल्लेख केला. आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रात किती दौरे केले, हे तपासा असंही पाटील म्हणाले. शिवसेनेतून नारायण राणे, भुजबळ, राज ठाकरे गेले तेव्हा उठाव झाला, मग आता काय झालं? आम्ही सत्तेतून बाहेर जातो तरी बंडखोर आहे म्हणता. तुम्ही आम्हाला पुन्हा मातोश्रीवर या सांगायला हवं होतं. मात्र निवडून येण्याची लायकी नसणारे आम्हाला बोलतात, अशी टीकाही त्यांनी केली.