‘आमदार आपल्या दारी’ उपक्रमात वाकड परिसरातील महत्त्वाच्या विकास कामांचा आढावा – आमदार शंकर जगताप यांनी केले ४८५ नागरिकांच्या तक्रारींचे ‘ऑन द स्पॉट’ निराकरण

0
3

वाकड, दि .२०(पीसीबी): चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांच्या पुढाकाराने ‘आमदार आपल्या दारी’ या जनसंपर्क उपक्रमांतर्गत वाकड परिसरातील नागरिकांशी थेट संवाद साधण्यात आला. हॉटेल बर्ड व्हॅली येथे झालेल्या या कार्यक्रमात ४८५ नागरिकांनी आपल्या अडचणी मांडल्या, त्यावर आमदार शंकर जगताप यांनी जागेवरच निर्णय घेत अधिकाऱ्यांना तातडीच्या कार्यवाहीच्या स्पष्ट सूचना दिल्या.

या बैठकीत महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी सेवा रस्त्यांचे काँक्रीटीकरण, मेट्रो स्टेशनजवळ पार्किंग सुविधा, वाकड सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील सुधारणा, सांडपाणी व्यवस्थापन व नदी-नाल्यांचे नैसर्गिक प्रवाह सुरळीत ठेवण्याच्या उपाययोजना, दत्त मंदिर रस्त्यासह प्रभागातीलआठवडे बाजार बंद करणे, अतिक्रमणमुक्त फूटपाथ व तसेच संपूर्ण वाकड परिसरातील सर्व रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण यावर चर्चा झाली.

अंडरपास परिसरात ‘पुश बॅक’ तंत्राचा वापर करून वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्याची योजना असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. विजेच्या तक्रारींसाठी तातडीने केबल बदलण्याचे आदेश देण्यात आले, तर पावसाळ्यात पाणी साचू नये यासाठी ड्रेनेज सिस्टीमच्या सुधारणा अधिकाऱ्यांना संयुक्त पाहणी करून तत्काळ सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले.

एनएचएआय, पीएमआरडीए आणि सर्व संबंधित शासकीय विभागांमध्ये समन्वय यंत्रणा विकसित करण्यात आली असून विधानसभेच्या अधिवेशनात या सर्व कामांना गती देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे आमदार शंकर जगताप यांनी स्पष्ट केले.

या उपक्रमात वाकड व पिंपळे निलख परिसरातील दफनभूमी आरक्षण रद्द करण्याच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत, आमदार शंकर जगताप यांनी आरक्षण रद्द करण्याची हमी दिली.

सार्वजनिक सुरक्षेसाठी पोलिसांना गस्त वाढविण्याचे आदेश देण्यात आले. वाकडकर वस्ती ते भुजबळ रस्ता रुंदीकरण, वाहतूक कोंडी, ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, अतिक्रमणमुक्त पादचारी मार्ग, सोसायट्यांचे कन्व्हेयन्स डीड, गृह रचना संस्थांना आमदार निधीतून अनुदान, वीज, पाणी, फुटपाथ या समस्या मांडण्यात आल्या.

वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून वाहतूक नियंत्रक दिवे बसवण्याचा प्रस्ताव, वाकड परिसरातील आठवडे बाजारांची पुनर्रचना व नियमन, सहकारी गृह रचना संस्थांमधील कचऱ्याच्या समस्यांवर तातडीने उपाय, आरोग्य व घनकचरा अधिकाऱ्यांना कडक शब्दांत सूचना देत कचरामुक्त प्रभागाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले.

विशेष म्हणजे या उपक्रमात दोन होतकरू तरुणांना नोकरीसाठी प्रत्यक्ष कंपन्यांशी संपर्क करून रोजगार उपलब्ध करून देण्यात आला.

या वेळी तहसीलदार जयराज देशमुख, अन्नधान्य विभागाचे क्षीरसागर, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता घंटे, स्थापत्य विभागाचे सुनील शिंदे, वाकड पोलीस ठाण्याचे अर्जुन पवार, वाहतूक विभागाचे निरीक्षक पिंजण, बीआरटीएसचे चंद्रकांत मोरे, महावितरणचे गिरी, विद्युत विभागाचे नागरे, ड्रेनेजचे विनय ओव्हाळ, उपअभियंता अमित दीक्षित, तलाठी चांदेकर यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाला संदीप कस्पटे, आरती चोंधे, विनायक गायकवाड, संकेत चोंधे, संतोष कलाटे, भारती विनोदे, विशाल कलाटे, राम वाकडकर, सचिन साठे, कुणाल वाव्हळकर, राहुल काटे, नितीन इंगवले, स्नेहा कलाटे, श्री कलाटे, गणेश कस्पटे, अमोल कलाटे, रामदास कस्पटे, रणजीत कलाटे, नवनाथ ढवळे, चेतन भुजबळ, नंदू बालवडकर, जालिंदर काटे, सुरेश राजे, तेजस्विनी डोमसे यांच्यासह अनेक आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
नागरिकांच्या दारापर्यंत सेवा पोहोचवणे, थेट संवादातून त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि समस्यांचे त्वरित निराकरण करणे हेच आमचे ध्येय आहे. वाहतूक, वीज, पाणी, ड्रेनेज, सार्वजनिक आरक्षणे, कचरा व्यवस्थापन आणि रोजगार यांसारख्या विविध विषयांवर ठोस निर्णय घेतले आहेत. ‘पुश बॅक’ तंत्र, सब स्टेशन, सुधारित ड्रेनेज आणि शासकीय यंत्रणांतील समन्वयाच्या जोरावर वाकड–पुनावळे परिसराचा सर्वांगीण विकास होईल, असा विश्वास आमदार जगताप यांनी व्यक्त केला.