आकुर्डी ते कोरेगाव पार्क, ३५ मिनिटांच्या रस्त्याला साडेचार तास – राजीव बजाज

0
7

पुणे, दि.२६ (पीसीबी) : वाढत्या वाहतूक कोंडीविषयी पुणेकर नेहमीच तावातावाने बोलतात. त्यात पावसाने भर पडली, की विचारायलाच नको. बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांना पुण्यातील वाहतूक कोंडीविषयी भीषण अनुभव आला.

पुणे शहरात बुधवारी झालेल्या मुसळधार पावसाने शहर ठप्प झालं होतं. शहरात ठिकठिकाणी पाणी साचल्याने किंवा झाडं पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार काल पुण्यात सकाळी साडेआठ ते संध्याकाळी साडेपाच वाजताच्या दरम्यान अतिमुसळधार पाऊस पडला. अशातच राजीव बजाज यांनी पुण्यातील वाहतूक कोंडीविषयी आलेला अनुभव मांडला आहे.

दररोज मला आकुर्डीतल्या कार्यालयातून कोरेगाव पार्कमधील घरी पोहोचायला ३५ मिनिटे लागतात. बुधवारी मला साडेचार तास लागले. मी संध्याकाळी पावणेपाच वाजता निघालो होतो. घरी पोहोचायला नऊ वाजून गेले, असे बजाज म्हणाले.