पिंपरी (दिनांक : १६ जून २०२५) ‘विज्ञानाच्या अति आहारी गेल्यामुळे आईचा पदर आता पूर्वीसारखा राहिला नाही; तसेच समाजात या पदराचा आदरही कमी झाला आहे!’ अशी खंत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि साहित्यिक डाॅ. लक्ष्मण शिवणेकर यांनी अंकुशराव लांडगे नाट्यगृह, भोसरी येथे रविवार, दिनांक १५ जून २०२५ रोजी व्यक्त केली. सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आणि राष्ट्रीय लोक अदालतीतील न्यायाधीश ॲड. रमेश उंबरगे लिखित ‘आईच्या मायेचा स्पर्श’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन करताना डाॅ. लक्ष्मण शिवणेकर बोलत होते. सेवानिवृत्त साहाय्यक पोलीस आयुक्त भाऊसाहेब आंदळकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते; तसेच ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत चौगुले, राजेंद्र घावटे, सामाजिक कार्यकर्ते
महेश स्वामी, साहाय्यक पोलीस आयुक्त बाळकृष्ण अंबुरे, शिवलिंग ढवळेश्वर, श्याम मोरे, वीरभद्र भातांब्रे, शिवमूर्ती भातांब्रे, मनोहर दिवाण, राजेंद्र वनारसे, कामगारनेते काशिनाथ नखाते, डॉ. अमोल विधाटे, हाॅटेल व्यावसायिक शिवराज पाटील, साहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण कांबळे, साहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील, महाराष्ट्र ग्रंथालय उपसंचालक बाबुराव हंद्राळे, माजी सरपंच बसप्पा रोडगे, वैभव पसरणीकर, गुंडेराव शेटकार, पोलीस निरीक्षक राजेश उंबरे, पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब कांबळे, मनपा अधिकारी रावसाहेब खंडागळे, उपप्राचार्य डॉ. कामायनी सुर्वे, प्रा. डॉ. शुभदा लोंढे आणि कवी ॲड. रमेश उंबरगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
डाॅ. लक्ष्मण शिवणेकर पुढे म्हणाले की, ‘वास्तविक आईविना भिकारी असल्यामुळे ईश्वराने मानवरूप धारण करून आईच्या पोटी जन्म घेतला, अशी आपली भारतीय संस्कृती मानते; परंतु आईच्या मायेचा स्पर्श हा काळानुसार बदलत गेला. या पार्श्वभूमीवर कवी रमेश उंबरगे यांच्या मातृप्रेमाची भक्ती आजही कायम आहे, ही समाजाला दिलासा देणारी बाब आहे!’ श्रीकांत चौगुले यांनी, ‘वयाच्या सत्तरीच्या टप्प्यावर असलेला कवी कवितांच्या माध्यमातून आईविषयी ऋण व्यक्त करतो, ही हृद्य बाब आहे; तसेच या सोहळ्यासाठी समाजातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली ही कवी रमेश उंबरगे यांची खरी श्रीमंती आहे. आई या विषयासोबतच कवीने जीवनाचे तत्त्वज्ञान आपल्या कवितांमधून मांडले आहे!’ असे विचार व्यक्त केले. याप्रसंगी आपल्या मनोगतातून ॲड. रमेश उंबरगे यांनी, ‘स्वतः निरक्षर असूनही आपल्या मुलाने खूप शिकावे म्हणून माझी आई संगम्माने खूप कष्ट उपसले. इयत्ता पाचवीत असताना ऐकलेली कवी माधव ज्युलियन यांची ‘प्रेमस्वरूप आई! वात्सल्यसिंधु आई!’ ही कविता माझ्या काळजावर कोरली गेली आहे. त्या प्रेरणेतून आई गेल्यानंतर काळजातील वेदनांचे शब्दरूप म्हणजे या कविता आहेत. त्यामुळेच या माझ्या कविता म्हणजे आईची आयुष्यभराची आठवण आहे!’ अशा भावना व्यक्त केल्या. भाऊसाहेब आंदळकर यांनी अध्यक्षीय मनोगतातून, ‘रमेश उंबरगे यांनी सुमारे पस्तीस वर्षे पोलीस खात्यात अतिशय प्रामाणिकपणे सेवा केली. त्यांच्या कविता संवेदनशील मनाचे दर्शन घडवणाऱ्या आहेत. जगात आईची माया हीच पूर्णपणे खरी असते; त्यामुळे व्हॉट्सॲप आणि फेसबुकपेक्षा आपल्या आईचे दर्शन घ्या!’ असे आवाहन केले.
नटराज कला क्रीडा प्रतिष्ठान, पिंपरी – चिंचवड या संस्थेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महेश स्वामी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी १९७८च्या पोलीस बॅचचे वसंत कामठे यांनी जुन्या फोटोंचा अल्बम सप्रेम भेट दिला. सुभाष बिराजदार यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.