अतुलदादा, या ठिकाणी तुझी बहिण असती, तुझी आई असती किंवा तुझी बायको असती तर तु असच बोलला असता का?

0
612

मुंबई, दि. २१ (पीसीबी) – मणिपूमध्ये महिलांवर झालेल्या अत्याचाराने संपूर्ण देशाचं राजकारण ढवळून निघालं आहे. सर्वोच्च न्यायालयाने देखील याची दखल घेत केंद्र सरकार आणि राज्य सरकारला फटकारलं. त्यावरून विरोधकांनी मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी सर्वोच्च न्यायालयावर टीका करणारे ट्विट केले. यावरून काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर भातखळकर यांच्यावर संतापल्याचं पाहायला मिळालं.

यशोमती ठाकूर मणिपूरमधील घटनेवरून सातत्याने आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे. यावेळी त्यांनी अतुल भातखरकर यांना सडेतोड प्रश्न विचारले. यशोमती ठाकूर म्हणाल्या की, अतुलदादा तुझी बहिण असती, तुझी आई असती किंवा तुझी बायको असती तर तु असच बोलला असता का? दादा आहेस ना तू? अरे राजकारण राजकारणाच्या ठिकाणी रे बाबा…काही सेन्सेविटी आहे की नाही? राजकारण करण्याच्या काही मर्यादा आहे की नाही? कशातही राजकारण करणार का, असे सवाल यशोमती ठाकूर यांनी उपस्थित केले.

सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केल्यानंतर भातखळकर यांनी ट्विट करून टीका केली होती. भातखळकर म्हणाले होते की, सरकारचे काम सर्वोच्च न्यायालय करणार असेल तर सर्वोच्च न्यायालयानेच देश चालवावा…कशाला हव्यात निवडणुका आणि संसद? खुर्चीत बसून कायदा सुव्यवस्थेची ऑर्डर पास केली की देश कसा सुरळीत चालेल.