अजित पवार यांच्या नाईलाज…खदखद…मुळ नाना पटोले संतापले

0
249

चिंचवड, दि. २२ (पीसीबी) – अजित पवार यांनी काँंग्रेसचे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतत्वाखाली नाईलाज म्हणून मुख्यमंत्री होतो, अशी खदखद व्यक्त केल्याने महाआघाडीतील घटकपक्ष असलेल्या काँग्रेसला खूप राग आला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दादा पवार यांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली आहे.

अजित पवार आणि संजय राऊत यांच्यातल्या वादावर संजय राऊत यांनी पडदा टाकला आहे. माझ्याकडून कुठलाही वाद आता नाही. अजित पवार हे स्वीट डिश आहे अत्यंत गोड माणूस आहेत असं म्हणत संजय राऊत यांनी हा पडदा टाकला. हा वाद मिटतो न मिटतो तोच अजित पवार विरूद्ध नाना पटोले असा वाद निर्माण होणार का? हा प्रश्न निर्माण झाला आहे कारण आम्ही पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात वरिष्ठांनी सांगितलं म्हणून आणि नाईलाजाने काम केलं असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. त्यावर नाना पटोलेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.

‘सकाळ’ ला मुलाखत देताना अजित पवार यांना एक प्रश्न विचारण्यात आला होता की कुणासोबत काम करताना तुम्हाला आनंद वाटला? त्यावर अजित पवार म्हणाले की महाविकास आघाडीचं सरकार असताना उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते. तर त्याआधी जेव्हा भाजपाची सत्ता नव्हती तेव्हा पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री होते. उद्धव ठाकरे आणि पृथ्वीराज चव्हाण दोघांनाही आमदारकीचा अनुभव नव्हता. पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकाळात आम्ही चार वर्ष काम केलं. २०१९ ला महाविकास आघाडी झाली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यांच्या अडीच वर्षांच्या काळात आम्ही एकत्रितपणे चांगलं काम केलं. कधी समाधानाने तर कधी नाईलाजाने काम करावं लागतं. असं म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत नाईलाजाने काम केल्याचं त्यांनी म्हटलं. त्यानंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आक्रमक झाले आहेत. तेव्हाच खदखद का व्यक्त केली नाही असा प्रश्न पटोले यांनी विचारला आहे.

नाईलाज हा शब्द का वापरत आहात ? मग तुम्ही शपथ घ्यायला नव्हती पाहिजे. तुम्ही पदावर बसून खदखद निर्माण करण्याऐवजी पद सोडून तुम्ही बोलायला हवं होतं. पृथ्वीराज बाबांविषयी अजित पवार बोलतील ही अपेक्षा नव्हती. पृथ्वीराज चव्हाणांबाबत असं बोलणं चुकीचं आहे. ते खुर्चीवर बसलेले असताना तुम्हाला असं वाटत होतं तर त्यावेळीच सोडून जायला हवं होतं. असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
अजित पवार यांच्या पृथ्वीबाबांविषयीच्या वक्तव्यामुळे नाना पटोले संतापले आहेत. त्यांनी अजित पवार यांनी असं वक्तव्य करणं बरोबर नाही म्हटलं आहे. त्यामुळे आता राज्यात नाना पटोले विरूद्ध अजित पवार असा संघर्ष पाहायला मिळणार का? हा प्रश्न चर्चेत आहे.