नवी दिल्ली, दि. ११ (पीसीबी) – परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्यावर झालेल्या लैंगिक छळाच्या आरोपांसंदर्भात त्यांनीच आपली बाजू स्पष्ट केली पाहिजे, असे उत्तर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी दिले व या वादावर भाष्य करणे टाळले. सोशल मीडियावर ‘मी टू’ ही मोहीम सुरु झाल्यानंतर अनेक महिला पत्रकारांनी अकबर यांनी पत्रकारितेत असताना लैंगिक छळ केल्याचा आरोप केला. त्यामुळे राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून याप्रकरणी मोदी सरकारने अद्याप मौन बाळगल्याने विरोधी पक्षांनी टीकेची राळ उडवली आहे. काँग्रेसने तर त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.