Desh

4 मुलांसह विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या….

By PCB Author

December 31, 2021

जालना, दि. ३१ (पीसीबी) – एका विवाहित महिलेने पोटच्या 4 मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना घडली आहे. जिल्ह्यातील घुंगर्डे हादगाव येथे आज सकाळी ही दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. कौटुंबिक वादातून या महिलेने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जातं आहे. या घटनेची माहिती मिळताच गोंदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. या प्रकरणी गोंदी पोलीस अधिक तपास करत आहेत.

32 वर्षीय गंगासागर अडाणी असं विवाहित महिलेचं नाव असून 13 वर्षीय भक्ती,11 वर्षीय ईश्वरी, 9 वर्षीय अक्षरा आणि 7 वर्षीय मुलगा युवराज अशी मयतांची नाव आहे. काल ३० डिसेंबर रोजी दुपारी १२ ते १ च्या दरम्यान गंगासागर ह्या तीन मुली आणि मुलासह शेतात चक्कर मारण्यासाठी गेल्याचे अनेकांनी पाहिले. गंगासागर यांनी मुलामुलीसह सायंकाळी 5.30 पर्यंत शेतातच वेळ घालवला. सात वाजेपर्यंत गंगासागर या मुलं मुलींसह घरी आल्या नसल्याने ज्ञानेश्वर अडाणी आणि गावातील नागरिकांनी रात्री उशिरापर्यंत त्यांची शोधाशोध केली. परिसरातील सर्व विहिरी व जायकवाडी डावा कालवा परिसर पिंजून काढला मात्र त्या आढळून आल्या नाही. रात्र होऊनही घरी न आल्यामुळे घरच्यांनी आणि गावातील काही लोकांनी त्यांचा शोध सुरू केला. मात्र आज सकाळी गंगासागरने आपल्या चार मुलांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली असल्याचे आढळून आले. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच गोंदी पोलीस ठाण्यात दिल्याने घटनास्थळी पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी जाऊन पाचही जणांचे मृतदेह विहिरी बाहेर काढले. पोलिसांनी मयत महिलेचे पती ज्ञानेश्वर यांना या प्रकरणी ताब्यात घेतले आहे.