Others

८० रुपयांच्या कर्जावर सुरु झाला कोट्यवधींची कमाई करणारा ‘लिज्जत पापड’; ‘लिज्जत पापड’ची हि लज्जतदार कहाणी

By PCB Author

January 20, 2021

सशाची ‘कर्रम कुर्रम, कुर्रम कर्र्म’ करणारी जाहिरात आली कि लिज्जत पापड आठवतो आणि सोबत जिभेवर रेंगाळणारी ती चवही आठवते. पापड म्हणजे भारतीय जेवणातली साइड डिश. तसं म्हटलं तर आजकाल स्टार्टर म्हणून मसाला पापात खूप जोमात आहे. कारण याच पापड्याच्या असण्याने जेवणाची लज्जतसुद्धा वाढते. रोजच्या जेवणात तर कधी मुगाच्या खिचडी बरोबर, संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी हा पापड खाल्ला जातो. पापड आता जेवणातला अविभाज्य घटक बनला आहे. आता भारतात मिळणाऱ्या पापडांमध्ये लिज्जत पापड हाही एक महत्वाचा भाग बनला आहे. लिज्जतने खूप मोठा व्यवसाय उभा केला आहे. पापडाला खरी प्रसिद्धी मिळवून दिली ती लिज्जत नेच, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

पण हा लिज्जत पापड नावारूपाला आला कसा? कुठे, कोणी याची निर्मिती केली माहितीये….?

तर ऐका दुपारच्या जेवणानंतर महिला एकमेकींसोबत ज्या वायफळ गप्पा मारतात असं आपण म्हणतो ना… तर त्याच गप्पांमधून लिज्जत पापडची निर्मिती झाली. असं म्हंटल तर वावगं ठरणार नाही.

मुंबईमध्ये १९५९ मध्ये सर्वसाधारण गुजराती घरांमधील महिला जेव्हा दुपारचं जेवण झाल्यावर थोडा वेळ मिळतो त्यात गप्पा मारायला एकत्र यायच्या. त्यातूनच त्यांना कळलं ,की आपले नवरे जे काही कमवतात त्यामध्ये संसार चालवणे प्रत्येकीलाच अवघड जातं. पण काय करावं, आपलं शिक्षण जास्त नाही आपण आपल्याच संसारासाठी, घरासाठी काय मदत करू शकतो यावर त्या बोलायच्या. तसं म्हटलं तर शिक्षण नसल्यामुळे बाहेर जाऊन नोकरी करणं त्यांना शक्य नव्हतं. आणि घरी लहान मुलं बाळ असल्यामुळे त्यांना सोडून जाणंही शक्य नव्हतं. घरची जबाबदारी सांभाळून त्यांना स्वतःचं काहीतरी करायचं होतं. 

जर त्यांना व्यवस्थित काही करता येत असेल तर तो स्वयंपाक. अशाच एकदा घरातल्या वाळवणाचे पदार्थ बनवण्यासाठी त्या गच्चीवर जमल्या. तिकडे पापड करताना त्यांना ही कल्पना सुचली, की आपण हे असे पापड विकले तर तो एक व्यवसाय होऊ शकेल.

जसवंतीबेन पोपट, जयाबेन विठलानी, पार्वतीबेन थोडाणी, उज्जंबेन कुंडलिया, बानुबेन तन्ना, चुताडबेन गावडे आणि लागूबेन गोकानी या सात महिलांनी मिळून हा व्यवसाय करायचे ठरवले. त्यांच्या मनात विचार आला खरा, मात्र हा व्यवसाय सुरु करणं तेवढं सोप्प नव्हतं..यासाठी जसवंतीबेन पोपट यांनी पुढाकार घेतला. त्यासाठी भांडवलाची गरज होती.. पण त्यांच्याजवळ कोणतही भांडवल नव्हतं. म्हणून त्यांनी आता कर्ज घ्यायचं ठरवलं… मग त्यांनी ८० रुपयांचं कर्ज काढलं आणि आणि हे कर्ज त्यांना देऊ केलं ते छगन लाल पारेख या एका सोशल वर्करनी. पुढे हेच छगन लाल पारेख त्यांचे मार्गदर्शक बनले. ते त्यांचे पुढे छगन बप्पा झाले. मिळालेल्या कर्जातून त्या सात जणींनी पापडासाठी लागणारं साहित्य आणलं. त्याचे एकूण पापडांचे चार पुडे तयार झाले. ते त्यांनी विकायला गिरगावातील एका दुकानात नेले.

तिथल्या दुकानाचे मालक आनंदजी यांनी त्यांचे ते पापड घेतले आणि अवघ्या काही तासांतच त्यांच्या पापडाची विक्री झाली. पुढे हळूहळू त्यांच्या पापडांना मागणी वाढली. परंतु क्वांटिटी पेक्षा क्वालिटी असं महत्वाचं असत.. त्यामुळे मागणी वाढतच छगन बाप्पानी त्यांना सांगितलं, की ‘कधीही कोणत्याही बाबतीत कॉलिटीशी तडजोड करायची नाही. नेहमी उत्कृष्ट कच्चामाल वापरूनच पापड बनवायचा.कुठेही गेले तरी लिज्जत पापड त्या चवीचेच असायला हवेत. कोणाकडूनही कुठल्याही प्रकारचं देणगी किंवा डोनेशन स्वीकारू नका. जे काही असेल फायदा-तोटा तो तुमच्यातच वाटून घ्या.’ छगन बाप्पांनी तेव्हा दिलेला हा सल्ला आजही लिज्जत पापड मध्ये वापरला जातो. महिलांनी सुरु केलेला हा उद्योग असल्यामुळे याला नाव देण्यात आलं “श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापड”.

सुरुवातीला पापड बनवताना त्यांना अनेक अडचणीही आल्या. पावसाळ्यामध्ये पापड वाळणे शक्य नसल्याने उद्योग बंद ठेवायला लागायचा. मात्र महिला कधी हार मानतात का? या महिलांनी त्यावर एक अजब शक्कल लढवली.जी त्यांना खूप उपयोगी ठरली. पूर्वी जे पलंग मिळायचे त्याच्याखाली एक स्टोव्ह चालू ठेवून पापड वाळवले जाऊ लागले. त्यामुळे बारा महिने लिज्जत पापड मिळणे शक्य झाले. बघता बघता त्यांच्या पापडाची किमया प्रत्येकाच्या तोंडी ऐकू यायला लागली. सुरुवातीला केवळ सात महिला यामध्ये काम करायच्या पण मागणी वाढली तशी त्यांनी अनेक गरजू महिलांना काम द्यायला सुरुवात केली. वर्षभरातच ७ महिलांच्या ऐवजी त्यांच्याकडे ३०० महिला कामाला लागल्या. १९६६ मध्ये ‘श्री महिला गृह उद्योग लिमिटेड’ रजिस्टर करण्यात आला. आणि आता पाहिलं तर ७ च्या ३०० आणि ३०० महिलांवरून हा आकडा आता तब्बल ४५ हजारांवर पोहचलाय.

मात्र या व्यवसायामध्ये अनेक अडचणी आल्या.. त्यावेळी प्रत्येक महिलेला काम करण्यासाठी बाहेर पडणे शक्य नसल्याने मग मळलेल्या पिठाचे एक सारख्या वजनाचे गोळे करून महिलांना घरी पापड लाटण्यासाठी देण्यात येऊ लागले. आजची वर्क फ्रॉम होम ही कल्पना लिज्जत पापड मध्ये सुरुवातीपासूनच सुरु झाली होती. मात्र घरून काम करता येत असलं तरी खाण्यापिण्याच्या गोष्टींबाबतीत स्वछता बाळगणं महत्वाचं असत.. त्यामुळे या महिला किती स्वच्छता बाळगून आणि कशाप्रकारे काम करतात हे पाहण्यासाठी अचानक पणे त्यांच्या घरांना भेटी देण्यात येतात. त्यामुळे स्वच्छता आणि गुणवत्ता याचं भान लिज्जत पापड मध्ये कायमच राखलं गेलं आहे.

महिला गृह उद्योग लिज्जत पापडचा उद्देश हाच आहे, की ‘महिलांनी स्वावलंबी व्हावं आत्मसन्मानाने जगावं.’ लिज्जत पापड मध्ये काम करणाऱ्या प्रत्येक महिलेला ‘बेन’ असंच म्हटलं जातं. या महिलापण अगदी बहिणीसारखी एकमेकिंना मदत करत असतात. जेव्हा नवीन महिलांना सुरुवातीला काम करताना अशा कामाचं टेन्शन येतं, तर त्यांना आधार देण्याचे कामसुद्धा याच महिला करतात. त्यांना कामाचं स्वरूप समजावून सांगतात. इथं काम करणाऱ्या महिला या खूप शिकलेल्या किंवा उच्चशिक्षित घरातल्या नसतात. स्वाती पराडकर या त्यापैकीच एक. ज्या इथे संचालिका म्हणून काम पाहतात.

जेव्हा स्वाती त्या दहा वर्षांच्या होत्या तेव्हा त्यांचे वडील वारले आणि कमी शिकलेल्या आईने मग पापड लाटायला सुरुवात केली. या त्यांच्या बरोबर आई बरोबर तिकडे जायच्या. हळूहळू मग त्यांनी तिथल्या ऑफिसचं काम शिकून घेतलं. ऑफिसचं काम करता करता त्या तिथल्या स्टोअर कीपर झाल्या. आणि असंच मनापासून काम करत करत त्या तिथे संचालिका झाल्या. स्वाती पराडकर म्हणतात, की आता नवीन टेक्नॉलॉजी येत आहे. तरी आजही लिज्जत पापड मध्ये पापड हे हातानेच लाटले जातात. तिकडे कोणतीही मशिनरी आम्ही वापरत नाही. याचं कारण हेच, की ‘लिज्जत पापड महिला गृह उद्योगचा उद्देश हाच आहे, की इथं महिलांनी स्वावलंबी व्हावे. त्यांना आत्मसन्मानाने जगता यावे. जर मशिनरी आणली तर अनेक महिलांचे रोजगार सुटतील आणि त्या बेरोजगार होतील. म्हणूनच कोणतीही मशनरी लिज्जत पापड मध्ये आणली जात नाही.’

आता महाराष्ट्राबाहेरही लिज्जत पापडच्या अनेक शाखा आहेत. लिज्जत पापड परदेशातही निर्यात केला जातो. लिज्जत पापडाची चव अजूनही तशीच आहे. आता पापडांमध्ये वेगवेगळ्या व्हरायटीज मिळतात. उडीद डाळ पापड, मुगडाळ पापड, लसूण मिरची पापड, पंजाबी मसाला पापड, जिरेमीरे पापड. पापडा बरोबरच इतरही उद्योग लिज्जत पापड मध्ये आता सुरू झाले आहेत,जसे की गव्हाचं पीठ, चपाती, मसाले, डिटर्जंट पावडर तयार केले जात आहेत. कॉलिटी च्या बाबतीत लिज्जत पापड कधीही तडजोड केलेली नाही. तिथे येणारी उडीदडाळ ही म्यानमार वरून येते, हिंग अफगाणिस्तानातून, तर काळी मिरी केरळमधून येते.

त्या महिला सकाळी साडेचार वाजल्यापासून काम करायला चालू करतात. ज्यांच्या घरामध्ये जागा नाही या महिलांना उद्योगाच्या ठिकाणी येऊन काम करण्यास परवानगी आहे. त्यांच्यासाठी मिनीबसची सोय केली आहे. ज्यांना घरात काम करणे शक्य आहे, त्यांना त्यांच्यासाठी जवळच्या केंद्रातून पीठ नेण्याची मुभा आहे. ज्या महिला काम करायला चालू करतात त्यांना तिसऱ्या दिवसापासूनच पगार मिळायला सुरुवात होते. आणि हे पैसे रोख दिले जातात. कारण बँकेचे व्यवहार करणे खूप जणींना माहीत नाहीत. परंतु आता मात्र या महिला सुशिक्षित होत आहेत. त्यांना शिक्षणाचे महत्त्व कळले आहे. आपल्या मुलांना त्या शिकवत आहेत.

लिज्जत मध्ये उत्कृष्ट काम करणार्‍या महिलांना बक्षिसी दिली जाते. कधी पैशाच्या रूपात तर कधी पाच ग्रॅम सोनं वगैरे देऊनही. लिज्जत पापडचा टर्नओव्हर आज काही कोटींच्या घरात आहे. लिज्जतने आपल्या जाहिरातीतही कधी मोठ्या कलाकारांना आणलेलं नाही. ग्राहक आणि तिथे काम करणाऱ्या महिला यांना मिळणारं समाधान हेच त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे. या महिला आता इतक्या सक्षम झाल्या आहेत कि, अनेकांनी त्यांची कॉपी करण्याचा प्रयत्न केला आहे. लिज्जत पापडाचे डुप्लिकेटसही काहींनी काढले. अशा लोकांना कायद्याचा बडगा देखील या महिलांनी दाखवला आहे. महिलांनी महिलांसाठी चालवलेला उद्योग म्हणजे ‘श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापड.’ यामध्ये महिलांना आर्थिक स्वावलंबन दिलं जातं. त्याचबरोबर त्यांच्यामध्ये आत्मविश्वास ही निर्माण केला जातो. त्यांना त्यांची ओळख निर्माण करता येते.

त्यामुळे हि अभिमानाची गोष्ट आहे कि, फक्त ७ महिलांनी सुरु केलेला हा व्यवसाय आज ४५००० लोकांचं कुटुंब चालवतोय. आणि ८० रुपयाचं कर्ज घेऊन सुरु झालेला हा लिज्जत पापड आज कोटींमध्ये उलाढाल करतोय….यांचं करावं तेवढं कौतुक थोडंच आहे…..