२०१९मध्ये देशाचा पंतप्रधान शेतकरी असेल- राजू शेट्टी

0
778

नवी दिल्ली, दि. ३० (पीसीबी) – ‘देशातील यापुढच्या निवडणुका शेतकऱ्यांच्याच प्रश्नांवर लढल्या जाणार आहेत. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करणाराच यापुढे देशावर राज्य करू शकणार आहे,’ असे सांगतानाच, २०१९मध्ये देशाचा पुढचा पंतप्रधान शेतकरीच असेल,’ असा ठाम विश्वास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी आज व्यक्त केला.

स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा, वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करा, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा यांसह विविध मागण्यांसाठी देशभरातून दिल्लीत धडकलेल्या शेतकऱ्यांनी आज रामलीला मैदान ते संसद असा विराट मोर्चा काढला. सकाळी दहाच्या सुमारास निघालेला हा मोर्चा पावणेबाराच्या सुमारास संसद मार्गावर पोहोचला. तिथे या मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी देशभरातून आलेल्या शेतकरी नेत्यांनी सभेला संबोधित केले.

राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना संबोधित करताना मोदी सरकारवर जोरदार टीका केली. ‘हा मोर्चा म्हणजे सरकारला दिलेला अल्टिमेटम आहे. सध्याच्या शेतकरी धोरणामध्ये आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे. जीएसटीसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले गेले. त्यासाठी दोन्ही सभागृहांनी एकत्र येऊन मध्यरात्री जीएसटीला मंजुरी दिली. जे जीएसटी केले जाते, ते शेतकऱ्यांसाठी का होऊ शकत नाही, असा सवाल करत,’ शेतकऱ्यांसाठी विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी शेट्टी यांनी केली.

पंजाब, बिहार, तामीळनाडू येथून आलेल्या शेतकरी नेत्यांनीही आपल्या प्रादेशिक समस्या मांडल्या. भाजप सरकारने दिशाभूल केल्याची भावनाही व्यक्त करण्यात आली. या मोर्च्याला दिल्लीकरांनी उत्सफूर्त प्रतिसाद दिला. दिल्लीतील कलाकार, पत्रकार, विद्यार्थी व अभियंते मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते.