भोपाळ, दि. २० (पीसीबी) – मुंबई हल्ल्यातील शहीद पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त विधानाप्रकरणी साध्वी प्रज्ञा यांनी माफी मागितली. मात्र, साध्वी यांनी आपल्यावर अन्याय झाल्याचे सांगितले आहे. जर तुम्हाला १५ ते २० पुरूष बेल्टने मारहाण करत असतील आणि निर्वस्त्र करून उलटे टांगून ठेवत असतील, तर तुम्ही काय करणार? असा सवाल साध्वी प्रज्ञासिंह यांनी केला आहे.
वादग्रस्त विधानावर प्रज्ञा सिंह यांना एका महिला पत्रकाराने प्रश्न केला. त्यावर उलट प्रश्न करत साध्वी म्हणाल्या की, तुम्ही स्त्री आहात. जर तुम्हाला १५ ते २० पुरूष बेल्टने मारत असतील, निर्वस्त्र करून मारत असतील. तर हे कोणत्या कायद्यात मोडते? दहशतवाद्यांच्या गोळीने जे मृत पावतात त्यांना शहीद दर्जा मिळतो. मी माफी मागितली आहे. मला ९ वर्ष प्रताडित करणाऱ्या लोकांकडून तुम्ही माफी मागवू शकता का? असा सवालही त्यांनी केला.
दरम्यान, साध्वी यांनी हेमंत करकरे यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले होते. या विधानावर देशभर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. सर्व स्तरातून साध्वी यांच्यावर संताप व्यक्त केला जात आहे. साध्वी यांना भाजपने भोपाळमधून लोकसभेची उमेदवारी दिली आहे. यावरूनही भाजपवर टीकेची झोड उठविण्यात येत आहे. अखेर साध्वी यांनी आपल्या विधानाप्रकऱणी माफी मागितली आहे.