हॉटेल्स आणि रेस्टॉरंट बाबत हा महत्वाचा निर्णय

0
379

मुंबई, दि.६ (पीसीबी) : ‘मिशन बिगीन’ अगेन अंतर्गत राज्यात आपण उद्योग व्यवसाय सुरु केले आहेत. महाराष्ट्रात पर्यटन व्यवसायांत हॉटेल उद्योगाचे मोठे स्थान आहे. हे लक्षात घेऊन हा उद्योग परत कसा सुरु करता येईल, यासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक कार्यपद्धती तयार करण्यात आली आहे. ती लवकरच अंतिम झाल्यावर हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सुरु करण्याचा विचार असल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितले. मात्र कोणत्याही हॉटेल व्यवस्थापनांनी आपल्या कामगार आणि कर्मचाऱ्यांना कामावरून काढू नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यातील हॉटेल्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. यावेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, पर्यटन प्रधान सचिव वल्सा नायर सिंह सहभागी होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी असे सांगितले.

बैठकीत ठरलेले मुद्दे –

  • राज्यातील हॉटेल व्यवसाय सुरु करण्याबद्दल लवकरच निर्णय
  • हॉटेल्स, रेस्टॉरंटसाठी एक कार्यपद्धती निश्चित केली आहे
  • लवकर ही कार्यपद्धती जाहीर केली जाणार
  • पर्यटन व्यवसायांत हॉटेल उद्योगाचे मोठे स्थान
  • हॉटेल्स आणि लॉज सुरु करण्यापूर्वी खूप काळजी घेऊन परवानगी द्यावी लागेल.
  • हॉटेल्समध्ये येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची वैद्यकीय तपासणी करावी लागेल.
  • एका कोविड पॉझिटिव्ह व्यक्तीमुळे हॉटेलमधील सर्व कर्मचारी आजारी पडू शकतात.
  • हॉटेल्स सुरु करायला काही अडचण नाही.
  • मात्र राज्य शासनाने आखून दिलेल्या कार्यपद्धतीप्रमाणे आपल्याला नियमांचे पालन करावे लागेल.
  • स्थानिक जे कामगार, कर्मचारी आपल्या हॉटेल्समध्ये आहेत त्यांना काढू नका.
  • कामगार संघटना देखील अवाजवी मागण्या करणार नाहीत याची काळजी घ्यावी

“हॉटेल उद्योग हा पर्यटन व्यवसायासाठी खूप महत्वाचा आहे. पर्यटन व्यवसाय हा राज्याच्या विकासाला उत्तेजन देऊ शकतो. यामुळे आपण नाईट लाईफला प्रोत्साहन दिले. मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद आणि इतर मोठ्या शहरांत आम्ही सगळे व्यवहार सुरु करताना भविष्यातील वाढती रुग्ण संख्या लक्षात घेतली. त्यानंतर जम्बो सुविधा वाढवण्यावर भर दिला आहे. या सगळ्या प्रयत्नांत हॉटेल्सनी आमच्या वैद्यकीय तसेच शासकीय यंत्रणांसाठी खूप मदत केली. कोरोनानंतर हा हॉटेल उद्योग परत जोमाने पायावर उभा राहिला पाहिजे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या उद्योगाने स्वयंशिस्तीसाठी स्वत:ला नियम घालणे महत्वाचे आहे,” असे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे  म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी हॉटेल व्यवस्थापनांनी कामगार व कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करू नये असे सांगून मुंबई व शहरांतील हॉटेल्स कोरोना युद्धात सोबत आहेत त्यासाठी त्यांचे अभिनंदन केले.पर्यटन व्यवसायातील महत्वाचा उद्योग असलेली हॉटेल्स,लॉजेस सुरु करण्यापूर्वी काळजी घेऊन परवानगी द्यावी लागेल.