नवी दिल्ली, दि. २२ (पीसीबी) – भारतातील इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रासंदर्भात हॅकर सय्यद शुजा याने लंडनमध्ये घेतलेली पत्रकार परिषद ही काँग्रेस आणि राहुल गांधी प्रायोजितच होती, असा आरोप भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज (मंगळवार) पत्रकार परिषदेत केला.
ही पत्रकार परिषद आशीष रे यांनी आयोजित केली होती, आशीष रे हे काँग्रेसच्या ‘नॅशनल हेरॉल्ड’ या दैनिकासाठी स्तंभलेखन करतात. या पत्रकार परिषदेत कपिल सिब्बल काय करत होते, असा सवाल उपस्थित करत ही पत्रकार परिषद काँग्रेस आणि राहुल गांधी प्रायोजितच होती, असा आरोप भाजपने केला आहे.
२०१९ मधील लोकसभा निवडणुकीत होणाऱ्या पराभवासाठी काँग्रेस आत्तापासूनच कारणे शोधत आहे. काँग्रेस पक्ष हा सुनियोजितपणे भारताचे संविधान आणि देशाच्या सर्वोच्च संस्थांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मतदानयंत्रांच्या (ईव्हीएम) साहाय्याने ‘घोटाळा’ करण्यात आल्याचा दावा अमेरिकेत राजकीय आश्रय मागितलेला भारतीय हॅकर सय्यद शुजाने सोमवारी केला होता. यावर भाजपने पत्रकार परिषद घेत काँग्रेसला प्रत्युत्तर दिले आहे.