नवी दिल्ली, दि. २३ (पीसीबी) – हुंडाबळीच्या प्रकरणात जोपर्यंत पतीच्या कुटुंबीयांचा सहभाग असल्याची शहानिशा होत नाही, तोपर्यंत त्यांची नावे या प्रकरणात घेण्यात येऊ नयेत, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या निकालामुळे कौटुंबिक वाद आणि हुंडाबळी सारख्या प्रकरणात नाहक अडकवल्या जाणाऱ्या सासरच्या मंडळींना मोठा दिलासा मिळाला आहे.
न्यायमूर्ती एस. ए. बोबडे आणि न्यायमूर्ती एल. नागेश्वर राव यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. हुंडाबळी आणि वैवाहिक वादांमध्ये पतीच्या नातेवाईकांविरोधात कारवाई करताना सावधानता बाळगण्याची सूचना न्यायालयाने दिल्या आहेत.
तक्रारदारांनी केलेल्या निराधार आरोपांवरुन पतीच्या कुटुंबीयाचे नाव खटल्यांमध्ये घेतले जाऊ नये. जोपर्यंत संबंधित नातेवाईकाचा त्या प्रकरणात सहभाग स्पष्ट होत नाही, तोपर्यंत त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात येऊ नये, असे न्यायालयाने म्हटले आहे.