Maharashtra

ही माझी शेवटची लोकसभा निवडणूक – सुशीलकुमार शिंदे

By PCB Author

April 16, 2019

सोलापूर, दि. १६ (पीसीबी) – २०१९ची लोकसभा निवडणूक ही आपली शेवटची निवडणूक आहे, असं जाहीर करतानाच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पुन्हा एकदा लोकसभेत जाण्याची संधी देण्याचे आवाहन मतदारांना केलं. सुशीलकुमार शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन हे आवाहन केलं. यावेळी त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि प्रतिस्पर्धी उमेदवार प्रकाश आंबेडकर यांच्यावरही टीका केली. प्रकाश आंबेडकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्त्वांना तिलांजली दिल्याची टीका त्यांनी केली. भाजपाकडे कोणाताही विकासाचा अजेंडा नाही. जातीय कारणांमुळे भाजपाने सिद्धेश्वर स्वामींना उमेदवारी दिली, असा आरोपही त्यांनी केला.

विकासाच्या मुद्द्यावरून शिंदे यांनी भाजपवर घणाघाती टीका केली. काँग्रेसची सत्ता असताना सोलापूरसाठी विद्यापीठाची स्थापना केली. उजनीसाठी पाणी आणले. रस्ते बांधले. भाजपाने काय केले ते सांगावे? असा सवाल करतानाच मी एनटीपीसीचा टाकाऊ प्रकल्प सोलापुरात आणल्याची टीका भाजपवाले करत आहेत. पण तुम्ही सोलापूरसाठी एक तरी टिकाऊ प्रकल्प आणला का? तुम्ही आणलेले प्रकल्प पाहण्यासाठी मी दुर्बिण लावून बसलो आहे, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.

मोदींना आव्हान

मागच्या लोकसभा निवडणुकीवेळी मोदींनी माझ्यावर टीका केली. मी गृहमंत्री असताना पॅरा मिलिट्री फोर्ससाठी सोलापुरातून एकही हँडलूम आणि पॉवरलूमचा कपडा खरेदी केला नाही, अशी टीका मोदींनी केली होती. मोदींनी स्वत: पाच वर्ष सत्ता उपभोगलीय, त्यांनी मिलिट्रीसाठी एक मीटर कपडा तरी खरेदी केलाय का? तसं त्यांनी दाखवून द्यावं, असं आव्हानच शिंदे यांनी मोदींना दिलं. यावेळी शिंदे यांनी हातजोडून मतदारांना मतदान करण्याचं भावनिक आवाहनही केलं.