ही केवळ जन आशिर्वाद यात्रा नाही, तर माझ्यासाठी तीर्थयात्रा – आदित्य ठाकरे

0
474

मुंबई, दि. २० (पीसीबी) – जर कोणाला शिवसेनेची ताकद पाहायची असेल तर त्यांनी माझ्यासोबत या जन आशिर्वाद यात्रेत यावे, मागिल काळात शिवसेनेच्या मागे खंबीर उभी राहिलेल्या जनतेचे आशिर्वाद घेण्यासाठी, आभार व्यक्त करण्यासाठी तसेच विरोधकांची मने जिंकण्यासाठी ही यात्रा काढण्यात आली आहे. त्यामुळेच ही केवळ जन आशिर्वाद यात्रा नसून माझ्यासाठी तीर्थयात्रा आहे, असे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी म्हटले. शनिवारी देवळाली येथे “जन आशीर्वाद यात्रा” विजय संकल्प मेळाव्यात ते बोलत होते.

यावेळी त्यांनी सांगितले की, महाराष्ट्राला समृद्ध करण्यासाठी जनतेचा शिवसेनेला पाठिंबा हवा आहे. ही यात्रा कोणाला तरी मुख्यमंत्री बनावयचे म्हणून काढलेली नाही की, सराकर स्थापन करायचे म्हणुनही काढलेली नाही. कारण, शिवसेना- भाजपा युतीचे सरकार येतच राहणार आहे. परंतु, मला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची शिकवण मिळालेली आहे की, आपला देव हा जनता जनार्दन आहे, त्यांचे आशिर्वाद घेऊन पुढे निघ तुला कोणीही अडवणार नाही, म्हणुन मी जनतेचे आशिर्वाद घेण्यासाठी आलो आहे, असेही आदित्य यांनी यावेळी म्हटले.