हीच ती वेळ म्हणता तर गेली पाच वर्षे काय करत होता?- राज ठाकरे

0
640

मुंबई, दि. १४ (पीसीबी) – हीच ती वेळ म्हणता तर गेली पाच वर्षे काय करत होता? हीच ती वेळ म्हणण्याचा अधिकार मला आहे. कारण सरकार तो अधिकार गमावून बसले आहे. नोकऱ्या मिळतील, बँकांची कामे सुरळीत होतील, पण त्यासाठी सरकारवर अंकुश हवा. त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांना मत द्या, असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. ‘मी कोणतेही आंदोलन अर्धवट सोडलेले नाही. रेल्वे भरतीसाठी आंदोलन केले, रेल्वे स्थानकांबाहेरील फेरीवाले हटवले, पोलिसांसाठी रस्त्यावर उतरलो, मराठी सिनेमे, मराठी माणसांसाठी आंदोलने केली. मनसेने ही आंदोलने केली,’ असे राज म्हणाले. मागाठणे येथील सभेत ते बोलत होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज प्रचाराच्या अखेरच्या रविवारीही मुंबईत प्रचाराचा सपाटा लावला.

काश्मीरमधले ३७० कलम हटवले ह्यावर भाजप महाराष्ट्रात मतदान मागत आहेत; कलम ३७० काढलेत, तुमचे अभिनंदन, पण महाराष्ट्राच्या प्रश्नांवर बोला.. भाजपला माहित आहे की भावनिक मुद्द्यांवर मतदान लोक मतदान करणार, बाकी त्यांना खड्ड्यात ठेवा, त्यांच्या नोकऱ्या गेल्या तरी लोकांना फरक पडत नाहीत.

मी आंदोलने अर्धवट सोडली म्हणता? मला सांगा कोणते आंदोलन अर्धवट सोडले? महाराष्ट्राला लुटणाऱ्या टोल नाक्यांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन केलं म्हणून महाराष्ट्रातले ७८ टोल नाके बंद झाले

छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक अरबी समुद्रात उभारणार होते त्यासाठी काय तर जलपूजन करून परत आले? काय झाले स्मारकाचे पुढे? का नाही उभे केले? मी नेहमी सांगत आलोय पुतळे उभारण्यापेक्षा महाराजांच्या पराक्रमाचे प्रतीक असलेले गड किल्ले आहेत ते आधी नीट राखा.