हिंजवडीतील छत्रपती शिवाजी चौकातील वाहतूक भूमकर चौक मार्गे वळविण्याची मागणी

0
819

चिंचवड, दि. २८ (पीसीबी) – हिंजवडीतील छत्रपती शिवाजी चौकापासून आयटी पार्क फेज १, फेज २, फेज ३ पर्यंत रस्त्यावरती होणारी वाहतूक कोंडी आणि हिजवडी गावठाणामध्ये आयटी पार्क कंपनीच्या वाहनांची वाहतूक बंद करून ती भुमकर चौकातून लक्ष्मी चौक मार्गे वळविण्यात यावी, अशी मागणी वंदे मातरम् शेतकरी विकास संघटनेचे अध्यक्ष जनार्दन पायगुडे यांनी हिंजवडीच्या वाहतूक पोलिस नियंत्रक शाखेकडे केली आहे.

त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, हिंजवडीतील छत्रपती शिवाजी चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. त्या चौकामध्ये गणपती मंदीर आहे. त्या मंदीराकडे येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांना वाहतूक कोंडीमुळे मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यातच हिंजवडी चौकातून मारुंजी, दत्तवाडी, कसारसाई ते चांदखेडपर्यंतच्या ग्रामीण भागापर्यंत अॅटोरिक्षा बेसुमार प्रवाशी घेवून वाहतूक करतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होती.

त्याचप्रमाणे, पुण्याकडून पिंपरी-चिंचवडकडे आणि पिंपरी-चिंचवडकडून पुण्याकडे जाणाऱ्या पीएमपी बसेस दर अर्ध्यातासाला आहेत. त्यासाठी प्रवाशी छत्रपती चौकातील गणपती मंदीरा समोर थांबतात. परंतू भाजीपाला विक्रेत आणि अॅटोरिक्षा भर चौकाचौकात चारही बाजूला पीएमपी बसस्टॉप जवळ थांबतात. त्यामुळे रस्त्यावरील अडथळ्यामुळे बसेस आणि इतर वाहनांना एक एक तास थांबावे लागते. यावर वाहतूक पोलिसांनी नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.

हिंजवडीतील छत्रपती चौक येथील अॅटो रिक्षा, भाजी, फळ विक्रेते आणि इतर व्यावसायिक मारुंजी रस्त्याच्या डाव्या बाजूला बसविण्यात यावे. त्यामुळे हा रस्ता वाहतूकीसाठी सुरळीत राहिल. तसेच, पुण्याकडून होणारी वाहतूक वाकड पुलावरून आणि हिंजवडीतील छत्रपती शिवाजी चौकापासून आयटी पार्क फेज १, फेज २, फेज ३ पर्यंत रस्त्यावरची होणारी वाहतूक भूमकर चौकातून लक्ष्मी चौक मार्गे वळविण्यात यावी, असे त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.