हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरण: मृत पीडित तरुणीच्या कुटुंबियांना घरात कोंडून उत्तरप्रदेश पोलिसांनी केले ‘तिच्या’ पार्थिवावर अंत्यसंस्कार

0
443

उत्तर प्रदेश, दि.३०(पीसीबी) : उत्तर प्रदेशातील हाथरस येथील सामूहिक बलात्कार प्रकरणावर देशभरातुन संताप व्यक्त केला जातोय. या प्रकरणातील पीडित तरुणीचा मंगळवारी उपचारादरम्यान मंगळवारी मृत्यू झाला. दिल्लीच्या सफदरजंग येथील रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु होते. तिची १४ सप्टेंबरपासून जीवनमृत्यूशी झुंज सुरु होती. अखेर मंगळवारी तिची प्राणज्योत मालवली. चौघांनी या तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. या तरुणीच्या मृत्यूनंतर उत्तर प्रदेशमधील वातावरण चांगलेच तापले असून आरोपींना कठोर शासन करण्याची मागणी होत आहे. मात्र आता या प्रकरणामध्ये पोलिसांच्या भूमिकेबद्दलही संशय व्यक्त केला जात आहे. मध्यरात्री ३ वाजता पीडित तरुणीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. पीडितेच्या कुटुंबाने उत्तर प्रदेश पोलिसांनी जबरदस्ती अंत्यसंस्कार केल्याचा आरोप केला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, तरुणीच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे कि,तरुणीच पार्थिव घरी आणल जाव यासाठी पोलिसांकडे वारंवार विनंती केली असताना सुद्धा पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. पोलिसांनी पीडितेच्या कुटुंबियांना घरात कोंडून तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केल्याचे सांगितले जात आहे.

“आम्ही या अंत्यसंस्काराला विरोध करत असतानाही तिच्यावर पोलिसांनी अंत्यसंस्कार केले. हिंदू संस्कृतीमधील परंपरेनुसार आम्हाला मुलीवर अंत्यसंस्कार करायचे होते. त्यामुळेच आम्ही दिवसा अंत्यसंस्कार करण्याची मागणी केली होती. आमच्या सर्व नातेवाईकांनी मुलीच्या अंत्यस्कारामध्ये सहभागी होऊन तिचे अंत्यदर्शन घ्यायचे होते. मात्र आमच्या मुलीचा मृतदेह पोलीस बळजबरीने घेऊन गेले. आमच्यापैकी कोणालाही तिच्या पार्थिवाजवळ जाऊ दिले नाही. आमच्यापैकी कोणीच तिच्या अंत्यसंस्कारामध्ये सहभागी झालं नाही. मला माझ्या मुलीचे अंत्यदर्शनही पोलिसांनी करु दिले नाही. अंत्यसंस्काराआधी मला तिचा चेहराही पाहता आला नाही,”असं तरुणीच्या वडिलांनी गहिवरल्या अवस्थेत एनडीटीव्हीशी बोलताना सांगितलं.

मात्र हे सारे आरोप उत्तरप्रदेशच्या पोलिसांनी फेटाळून लावले आहेत. आम्ही कुटुंबाच्या परवानगीनंतरच अंत्यसंस्कार केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. पीडितेच्या कुटुंबातील सर्वजण यामध्ये सहभागी झाले होते. पोलिसांसमवेत जिल्हाधिकारी प्रवीण कुमार लक्सर यांनी प्रसारमाध्यमांवर टीका करत सर्व बातम्या चुकीच्या असल्याचे म्हटले आहे. कुटुंबाच्या परवानगीनंतरच अंत्यसंस्कार करण्यात आले आणि कुटुंबिय सहभागी झाले होते असं जिल्हाधिकारी म्हणाले.