हर्षवर्धन पाटील बारामतीच्या पालख्या कितीही वाहा, तुमचा विधानसभेला पराभव निश्चित – मुख्यमंत्री

0
677

इंदापुर, दि. २१ (पीसीबी) – तुम्ही कितीही बारामतीच्या पालख्या वाहा,  तुमचा विधानसभा निवडणुकीत पराभव  निश्चित आहे.  हे विश्वासघाताचे राजकारण १९९१ पासून सुरू आहे.  येत्या  विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन यांचा विश्वासघात होणार  आहे, त्याआधी  त्यांनी वेळीच सावध  व्हावे, असा इशारा मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांना दिला.

भाजपच्या  उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचाराची सांगता सभा आज (रविवार)  इंदापुरात  झाली.  या सभेत फडणवीस बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, बारामतीत इतिहास घडणार आहे.  इंदापूरच्या जनतेलाही बारामतीच्या कचाट्यातून मुक्ती हवी आहे .लोकसभेसाठी इंदापूरची मदत मागण्यासाठी बारामतीचे नेते येतात. पण नंतर फिरकत नाही, असा आरोप फडणवीस यांनी  केला.

माझे कुलदैवत नीरा-नरसिंहपूर हे याच इंदापूर तालुक्यात आहे. या वेळी बारामतीत बदल घडविण्यासाठी मी तेथे कौल मागितला आहे. त्यामुळे तसेच घडणार आहे. इंदापूरच्या मतदारांनी या इतिहास घडविण्यासाठी सज्ज राहावे.  तसेच मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांना मतदान करून बारामतीत इतिहास घडवण्याचे आवाहन मतदारांना केले.