Maharashtra

स्वाभिमानीची महाआघाडीशी फारकत; लोकसभेच्या ९ जागांवर लढण्याची तयारी

By PCB Author

February 12, 2019

मुंबई, दि. १२ (पीसीबी) – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व  खासदार राजू शेट्टी यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत महाआघाडीत जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे. याबाबत  येत्या ४ ते ५ दिवसात  संघटनेच्या राज्य कार्यकारिणीमध्ये निर्णय जाहीर करण्यात येणार आहे, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ९ जागांवर लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी देखील केली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीला ६ जागांचा प्रस्ताव स्वाभिमानीने दिला होता, त्यातील  ३ जागांवर शेट्टी ठाम होते. त्यामध्ये हातकणंगले, बुलढाणा आणि वर्धा या लोकसभा मतदार संघांचा समावेश आहे.

राजू शेट्टी यांनी बुलढाण्याची जागा स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांच्यासाठी तर वर्ध्याची जागा माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांच्यासाठी मागितली होती. मात्र याबाबत ठोस काही चर्चा झाली  नाही, त्यामुळे राजू शेट्टी यांनी  महाआघाडीशी  फारकत घेत स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. हातकणंगले, बुलढाणा, वर्धा, माढा, कोल्हापूर, सांगली, धुळे, शिर्डी, लातूर या ९ जागांवर निवडणूक लढण्याची तयारी संघटनेने केली आहे.