‘स्वान्तसुखाय केलेले समाज कार्य आत्मानंद देते’: राज्यपाल

0
236

राज्यपालांच्या हस्ते खासगी वैद्यकीय क्षेत्रातील ५० करोना वीरांचा सन्मान

मुंबई,दि.३०(पीसीबी) – कुठल्या पदासाठी, पैश्यांसाठी अथवा मानसन्मानासाठी केलेल्या कार्यापेक्षा स्वान्तसुखाय केलेले समाज कार्य आत्मानंद देते. करोनाचे आव्हान अद्याप संपलेले नाही यास्तव मनुष्य सेवा ही ईश्वर सेवा मानून आरोग्य सेवकांनी यापुढेदेखील आपले सेवाकार्य सुरूच ठेवावे असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज वैद्यकीय क्षेत्रातील करोना योद्ध्यांना केले. देशातील करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४ टक्के इतके असून हे कार्य साध्य करणार्‍या करोना वीर व वीरनारींच्या कार्याची दखल इतिहास निश्चितपणे घेईल असे राज्यपाल यावेळी म्हणाले.

महाराष्ट्र वैद्यकीय आघाडीतर्फे राजभवन येथे रविवारी (दि. २७) आयोजित करोना वीरांच्या सन्मान सोहळ्यात राज्यपालांच्या हस्ते करोना योद्ध्यांना सन्मानित केले गेले, त्यावेळी राज्यपाल बोलत होते.

राज्यपालांच्या हस्ते डॉक्टर्स, दंतवैद्य, विशेषज्ञ, फार्मसिस्ट, लॅब तंत्रज्ञ यांसह खासगी आरोग्य क्षेत्रातील ५० करोना योद्ध्यांच्या सत्कार करण्यात आला.

मनुष्य सेवा ही साक्षात परमेश्वराची सेवा आहे, ही सेवा करण्याचे भाग्य वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना लाभले. देशातील खासगी डॉक्टरांनी व इतर आरोग्य सेवकांनी या संकट प्रसंगी स्वत:चा जीव धोक्यात घालून आरोग्य सेवा दिल्यामुळेच भारतातील करोना रुग्ण बरे होण्याचा दर सर्वाधिक आहे, असे प्रशंसोद्गार राज्यपालांनी यावेळी काढले.

यावेळी महाराष्ट्र वैद्यकीय आघाडीचे निमंत्रक डॉ अजित गोपछडे, मुंबई प्रदेश निमंत्रक डॉ. स्मिता काळे, कान, नाक घसा तज्ञ डॉ. राहुल कुलकर्णी यांसह वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. राज्यपालांच्या हस्ते डॉ मेघना चौगुले लिखित ‘न्युरोप्याथॉलॉजी ऑफ ब्रेन ट्यूमर्स विथ रेडिओलोजिक कोरिलेट्स’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

डॉ स्वप्नील मंत्री, डॉ सचिन बागडिया, डॉ गोविंद भदाणे, डॉ सुनील आवारी, राकेश जैन, संजय धोत्रे, डॉ बाळासाहेब हरपाळे, डॉ उज्वला हाके, डॉ अनुप मारार, डॉ हृषीकेश नाईक, डॉ विपुल जोशी, डॉ चिन्मय देसाई आदींचा राज्यपालांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला.