नवी दिल्ली, दि. १५ (पीसीबी) – भारताच्या स्वातंत्र्य लढयात अमूल्य योगदान देणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांवरुन पुन्हा एकदा राजकारण सुरु झाले आहे. भाजपाचा निवडणूक जाहीरनामा आज प्रसिद्ध झाला. त्यामध्ये त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना मरणोत्तर ‘भारत रत्न’ पुरस्कार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करु असे आश्वासन दिले आहे. त्यावर काँग्रेसने सत्ताधारी भाजपावर हल्लाबोल केला आहे.
“महात्मा गांधींच्या हत्या प्रकरणात स्वातंत्र्यवीर सावरकरांना गुन्हेगारी खटल्याला सामोरे जावे लागले होते. कपूर आयोगाने सुद्धा त्यांची चौकशी केली होती” असे काँग्रेस नेते मनीष तिवारी पत्रकार परिषदेत म्हणाले. भाजपाने आपल्या निवडणूक जाहीरनाम्याला ‘संकल्पपत्र’ असे नाव दिले आहे. पुढच्या पाच वर्षात पाच कोटी नोकऱ्यांच्या निर्मितीसह महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलयन डॉलरची करण्याचे आश्वासन दिले आहे.
२०२२ पर्यंत प्रत्येकाला घर देण्याचेही वचन दिले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना ‘भारत रत्न’ पुरस्कार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले आहे.