सोनभद्र हत्याकांडमध्ये प्रियांका गांधींना यूपी पोलिसांनी घेतले ताब्यात

0
376

नवी दिल्ली, दि, १९ (पीसीबी) – सोनभद्र जिल्ह्यातील हत्याकांड प्रकरणावरून उत्तर प्रदेशातील राजकारण प्रचंड तापलंय. काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी आज वाराणसीत जाऊन जखमींची भेट घेतली. त्यानंतर सोनभद्रमध्ये घटनास्थळी जात असतानाच, प्रियांकांचा वाहनताफा अडवण्यात आला. त्यानंतर तिथे रस्त्यावरच ठिय्या मांडणाऱ्या प्रियांकांना उत्तर प्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतले.

प्रियांका गांधी या शुक्रवारी सोनभद्र हत्याकांडातील पीडितांना भेटण्यासाठी जात होत्या. त्यावेळी पोलिसांनी नारायणपूर पोलीस ठाण्याजवळ त्यांचा वाहनताफा अडवला. याविरोधात प्रियांकांनी धरणे धरले. त्यानंतर पोलिसांनी प्रियांकांना ताब्यात घेतले. त्यांना चुनार गेस्ट हाऊसला नेण्यात आले. ‘आम्हाला केवळ पीडित कुटुंबीयांची भेट घ्यायची आहे. माझ्यासोबत फक्त चार जण असतील असंही मी सांगितलं. तरीही हे प्रशासन आम्हाला तिथे जाऊ देत नाही. आम्हाला का अडवलं याचं उत्तर द्यायला हवं,’ असं प्रियांका म्हणाल्या. मला कुठे घेऊन जात आहेत याची कल्पना नाही. पण जिथे घेऊन जातील तिथे जायला मी तयार आहे. आता झुकणार नाही, असंही त्या अटकेनंतर म्हणाल्या.