सुपरस्टार रजनीकांत यांचा राजकारण प्रवेश तमिळनाडू विधानसभेला!

0
419

चेन्नई, दि. २० (पीसीबी) – तमिळनाडूमधील आगामी विधानसभा निवडणुकांपासून आपण आपल्या राजकीय कारकिर्दीस प्रारंभ करणार आहोत, अशी घोषणा तमिळ सुपरस्टार रजनीकांत यांनी केली आहे. तमिळनाडूमध्ये ज्यावेळी निवडणुका होतील त्यावेळी मी राजकारणात प्रवेश करीन, असे रजनीकांत यांनी सांगितले.

राज्यातील २२ विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुका आणि लोकसभेच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर राजकारण प्रवेशाचा निर्णय घेणार का, या प्रश्नाचे उत्तर त्यांनी टाळले. तमिळनाडू विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी आपण नव्या पक्षाची स्थापना करू आणि निवडणूक लढवू, असे रजनीकांत यांनी यापूर्वीच जाहीर केले होते. विधानसभेत आपला पक्ष सर्वच्या सर्व म्हणजे २३४ जागा लढवेल, असेही ते म्हणाले होते.

तमिळनाडूमध्ये २०२१ साली विधानसभा निवडणुका नियोजित आहेत. मात्र, पोटनिवडणुकांच्या निकालांवर सध्या अल्पमतात असलेल्या अण्णा द्रमुक सरकारचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. मुख्यमंत्री के. पळणीस्वामी यांच्या नेतृत्वातील सरकारला बहुमतासाठी ११७ जागांची आवश्यकता असून सध्या त्यांच्याकडे ११३ जागा आहेत.