सावरकर पंतप्रधान झाले असते, तर पाकिस्तान जन्मालाच आला नसता – उद्धव ठाकरे

0
432

मुंबई, दि. १८ (पीसीबी) – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या कार्याची स्तुती करत त्यांना भारतरत्न देण्याच्या मागणीचे समर्थन केले. त्या काळी सावरकर जर देशाचे पंतप्रधान असते तर आज पाकिस्तानच जन्मालाच आला नसता असेही ते यावेळी म्हणाले. दरम्यान, त्यांनी सावरकर यांचा भारतरत्न देऊन गौरव करण्याची मागणी केली.

‘सावरकर: इकोज फ्रॉम अ फरगॉटन पास्ट’ या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी उद्धव ठाकरे उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते. “आमचं सरकार हे हिंदुत्ववादी सरकार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा भारतरत्न पुरस्काराने गौरव केला पाहिजे. आम्ही महात्मा गांधी आणि पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी केलेले कार्य नाकारत नाही,” असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. यापूर्वीही ठाकरे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याची मागणी केली होती.

“देशासाठी काही काळ नेहरूंनी तुरूंगवास भोगल्याचे राहुल गांधी म्हणाले होते. मी त्यांना सागू इच्छीतो की सावरकर यांनी १४ वर्षांचा तुरूंगवास भोगला आहे आणि त्यांनी मरणयातनादेखील भोगल्या आहेत. जर नेहरूंनी अशा यातना भोगल्या असत्या आणि ते १४ मिनिटांसाठी जरी तुरूंगात गेले असते तरी त्यांना नायक म्हणण्यास आमची हरकत नव्हती,” असेही ठाकरे यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्यावरही टीका केली. तसेच त्यांना या पुस्तकाची प्रत दिली पाहिजे, असेही ते म्हणाले.

“सावरकर यांना ज्या तुरूंगात ठेवण्यात आलेले त्याचा आज पिकनिक स्पॉट करण्यात आला आहे आणि हे अतिशय दुर्देवी आहे. काही लोकांसाठी तुरूंग हा पिकनिक स्पॉटच झाला आहे. परंतु सावरकरांनी तुरूंगात असताना किती यातना भोगल्या हे लोकांना माहित नाही,” असेही त्यांनी नमूद केले.