सावधान…. ‘या’ कारणांमुळे कोरोना वाढतोय

0
240

नवी दिल्ली, दि. २७ (पीसीबी) – देशातील कोरोना रूग्णसंख्येत गेल्या काही महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. तसेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः हाहाकार माजवल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं. वाढती रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनला असतानाच देशात वेगानं लसीकरण सुरु करण्यात आलं. यामुळे नागरिकांना दिलासा मिळत आहे. अशातच देशातील नव्या कोरोना रुग्णसंख्येत चढउतार सुरूच असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. त्यात गेल्या 24 तासात देशातील सक्रीय बाधितांच्या संख्येत चढउतार सुरूच आहे. शहरांतून सर्व निर्बंध शिथील करण्यात आल्याने नागरिकांनी मास्कचा वापर, सोशल डिस्टंन्सिंग, सॅनिटायझरचा वापर, हात धुणे या नित्याचे उपक्रमांकडे सर्रास दुर्लक्ष तसेच गर्दीवर नियंत्रण नसल्याने पुन्हा कोरोनाचा धोका वाढतो आहे.

गेल्या 24 तासात भारतात 13 हजार 451 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 585 रुग्णांना प्राण गमवावे लागले. काल दिवसभरात देशात 14 हजार 021 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. देशभरात सध्या 1 लाख 62 हजार 661 सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आतापर्यंत देशभरात 04 लाख 55 हजार 653 जणांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. देशातील कोरोना रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत होती. पण आता हळूहळू कोरोना आटोक्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे.

दरम्यान, भारतात लसीकरण मोहिम मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे. देशाने लसीकरणात नवा विक्रम नोंद करत आतापर्यंत 103 कोटी 53 लाख 25 हजार 577 नागरिकांचं लसीकरण झाल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. तसेच लसीकरण मोहीम संपुर्ण देशभरात मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे.