“सर्वोच्च न्यायालयात सरकारचे वकील सुनावणीला उपस्थित राहत नाहीत, हे दुर्दैव आहे”

0
260

मुंबई,दि.२७(पीसीबी) – मराठा आरक्षण प्रकरणावरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयानं चार आठवड्यांसाठी तहकूब केली आहे. तत्पूर्वी राज्य सरकारचे वकील उपस्थित न राहिल्यानं काही काळ सुनावणी स्थगित करावी लागली होती. राज्य सरकारच्या या हलगर्जीचे तीव्र पडसाद उमटत आहेत. खासदार संभाजीराजे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

‘सर्वोच्च न्यायालयात सरकारचे वकील सुनावणीला उपस्थित राहत नाहीत. हे दुर्दैव आहे. अत्यंत गंभीर बाब आहे. मराठा आरक्षणविषयक उपसमितीचे अध्यक्ष असलेल्या अशोक चव्हाणांनी याकडं लक्ष द्यायला हवं. ते जिथं कुठं असतील तिथून त्यांनी समन्वय साधायला हवा. सामान्य प्रशासन विभागाच्या संबंधित सचिवांना सूचना द्यायला हव्या,’ असं आवाहन संभाजीराजे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केलं. ‘राज्य सरकारच्या वकिलांवर आमचा पूर्ण विश्वास आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू मांडणं गरजेचं आहे. यावर अधिक काय बोलणार,’ असंही ते म्हणाले.

दरम्यान अशोक चव्हाण यांच्याशी आपण पुन्हा बोलणार आहात का असं विचारलं असता संभाजीराजे म्हणाले, ‘किती बोलायचं? सरकारला आणखी काय सांगायचं? फोन करून काय करू? अशोक चव्हाणांना ह्या गोष्टी कळत नाहीत का? मी आणखी नवीन काय सांगणार? माझा जीव धोक्यात घालून मी महाराष्ट्रात फिरतोय. गर्दीत फिरतोय. सरकारनं गांभीर्यानं पावलं उचलावीत. अजूनही वेळ गेलेली नाही, एवढीच माझी विनंती आहे.’