Maharashtra

“सर्वाधिक लसी महाराष्ट्राला दिल्या, तरी राज्य सरकारची तक्रार आहेच”

By PCB Author

August 16, 2021

मुंबई, दि.१६ (पीसीबी) : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांच्या जनआशीर्वाद यात्रेला आज पालघरमधून सुरुवात होत आहे. त्यांच्या या यात्रेमध्ये विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरही सहभागी झाले आहेत. मोदी सरकारच्या कामाची, महत्त्वाच्या निर्णयांची माहिती जनतेला देण्यासाठी त्याचबरोबर महाविकास आघाडी सरकारमधील त्रुटी दाखवण्यासाठी ही यात्रा आयोजित केली असल्याचं पवार यांनी सांगितलं. कोविड प्रतिबंधाचे नियम पाळून जास्त गर्दी न करता ही यात्रा करणार असल्याचंही पवार यांनी सांगितलं.

भारती पवार यांची ही जनआशीर्वाद यात्रा पालघर, मनोर, चारोटी, तालसरी, विक्रमगड, जव्हार, मोखाडामार्गे जाणार आहे. केंद्रीय मंत्री म्हणून स्थानिक आरोग्यसुविधांना कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे हे पाहणं आपली जबाबदारी असल्याचं भारती पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. केंद्र सरकारने सर्वाधिक लसी महाराष्ट्राला उपलब्ध करुन दिल्या आहेत. परंतु, राज्य सरकार तरीही लसींचा पुरवठा होत नाही अशी तक्रार करत आहे, अशा शब्दांत त्यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. “आपल्या या जनआशीर्वाद यात्रेदरम्यान ग्रामीण भागातल्या लसीकरणाची माहिती घेणं, त्यांच्या अडचणी जाणून घेणं ही आपली जबाबदारी आहे. कोणीही आरोग्य सुविधांपासून वंचित राहू नये हाच या जनआशीर्वाद यात्रेचा हेतू असणार आहे”, अशी माहिती भारती पवार यांनी दिली.