सरसंघचालकांकडून हिंदुत्व समजून घ्या – उध्दव ठाकरे हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवाच, भाजपला थेट आव्हान

0
214

मुंबई, दि. २५ (पीसीबी) – हिंदुत्वावरून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी भाजपची आज अत्यंत परखड शब्दांत खरडपट्टी केली. मंदिरं खुली करण्यावरून ठाकरे यांना पत्र लिहित राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी हिंदुत्वावरून डिवचलं होतं. त्या पत्राला मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी उत्तर दिलं होतं. काळी टोपी घालणाऱ्यांनी सरसंघचालक हिंदुत्वाबाबत काय म्हणतात ते समजून घ्यावं,” असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. आपल्या भाषणात सरकार पाडून दाखवाच, असे खुले आव्हान ठाकरे यांनी भाजपला दिले.

मुंबईतील शिवाजी पार्कवर शिवसेनेच्या वतीनं दसरा मेळाव्याचं आयोजन केलं जातं. यंदा करोनाच्या सावटामुळे सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करून हा सोहळा आयोजित करण्यात आला. यंदा हा सोहळा स्वातंत्र्यावीर सावरकर सभागृहात मोजक्या मान्यवरांच्या उपस्थित साजरा करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना संबोधित केलं.
शिवसेनाप्रमुख यांचे हिंदुत्व आणि तुमचे हिंदुत्व यात फरक आहे. नुसत्या थाळ्या आणि टाळ्या पिटुन काही होत नाही, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला. इथं गाय म्हणजे माता आणि पलीकडे जाऊन खाता, हे कसले हिंदुत्व असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. “हिंदुत्वाबद्दल आम्हाला प्रश्न विचारले जातात, का तर मंदिरं उघडले नाहीत म्हणून.. पण आम्हाला कोण विचारतंय… ज्यावेळी बाबरी पाडली त्यावेळी हे शेपट्या घालून बसले होते. आमचं हिंदुत्व असलं नाही, हिंदुत्व हे आमचं राष्ट्रीयत्व आहे. सरसंघचालकांकडून हिंदुत्व शिकून घ्या. काळी टोपी घालणाऱ्यांनी सरसंघचालक हिंदुत्वाबाबत काय म्हणतात ते समजून घ्यावं,” असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

आम्ही गुळाला चिकटलेले मुंगळे नाहीत –
शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ऑनलाईन दसरा मेळाव्यातून जनतेशी संवाद साधत आहेत. राज्यातली महाविकास आघाडीचं सरकार पाडण्याच्या गोष्टी काहीजण करत आहेत. त्यासाठी तारीख पे तारीख देत आहेत. हिंमत असेल तर त्यांनी सरकार पाडून दाखवा, असं आव्हान उद्धव ठाकरेंनी दिलं. आम्ही गुळाला चिकटलेले मुंगळे नाहीत. महाराष्ट्र हा लेच्या पेच्यांचा प्रदेश नाही, हे वाघांचं राज्य आहे. जो महाराष्ट्रच्या आडवा येईल त्याला आडवा पाडून गुडी उभी करणार असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला.
नितीशकुमार मुख्यमंत्री ही भाजपची खेळी –
भाजपने बिहारमध्ये नितीश कुमार यांना मुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा दर्शवला आहे. हीच खेळी त्यांनी महाराष्ट्रात केली होती. एकीकडे पाठिंबा दाखवायचा आणि छुप्या मार्गाने दगा करायचा. मात्र आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकलोय. महाराष्ट्रातही हाच डाव होता, मात्र शिवसेनेनं हा डाव हाणून पाडला, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
देशात कोरोनाचं संकट असताना त्यांना राजकारण सूचतंय. निवडणुकीच्या तोंडावर बिहारमध्ये मोफत कोरोनाची लस देण्याची घोषणा करता. मग उर्वरित भारत काय बांगलादेश आहे का? त्यांच्याकडून पैसे घेणार का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला.

नारायण राणेंची बेडकाशी तुलना

आजचा शिवसेनाचा दसरा मेळावा कोणाला टार्गेट करण्यासाठी नाही. पण काही जणांना इंजेक्शन देने गरजेचे असते ते आम्ही देतो. बेडके किती ही फुगले तरीही ते वाघ होत नाहीत, तुम्हाला माहिती आहे, एक बेडूक आणि त्याची दोन पोरं या पक्षातून त्या पक्षात उड्या मारतात. या बेडकाच्या पिल्लांनी वाघ पाहिला, त्यांनी बाबांना सांगितलं, असा टोला उद्धव ठाकरेंनी राणे पिता-पुत्रांना लगावला. आज मी मुख्यमंत्रीपदाचा मास्क बाजूला ठेवलाय. ज्याला कुणाला खुमखुमी आली असेल तर त्यांनी आजमावून पाहा. तुम्ही जर आमच्या वाटेला आलात तर तुम्हाला धडा शिकवला जाईल.