“सरनाईकांनी माझ्यावर १०० कोटींचा मानहानीचा दावा दाखल करावाच”; किरीट सोमैय्यांचं खुलं आव्हान

0
193

मुंबई, दि.१९ (पीसीबी) : भाजपचे माजी खासदार किरीट सोमैया यांनी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या विहंग ग्रुप ऑफ बिल्डर्सने बांधलेल्या दोन इमारतींमध्ये चार मजल्यांचे अनधिकृत बांधकाम केल्याचा आरोप केला आहे. तर यावर प्रतिक्रिया देत सोमैया यांनी आठ वर्षे जुने प्रकरण बाहेर काढून जाणीवपूर्वक बदनामीचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या अब्रूनुकसानीचा दावा करणार असल्याचे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. तर भाजपा नेते किरीट सोमैया यांनी उलट प्रतिक्रिया देत प्रताप सरनाईक यांनी माझ्या विरुद्ध मानहानीचा दावा दाखल करून दाखवावा,असे खुले आव्हान दिले आहे. सरनाईक आणि किरीट सोमैया यांचा क्रिया प्रतिक्रियांचा खेळ चांगलाच रंगलाय.

किरीट सोमैया यांनी ट्विट करत “शिवसेना प्रताप सरनाईकनी माझ्याविरुद्ध १०० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल करावाच. त्यांचा भ्रष्टाचार, घोटाळे उघड करण्याचा आमचा लढा सुरूच राहील.” असं आव्हान सरनाईकांना दिल आहे. किरीट सोमैया म्हणत आहे कि, ‘आठ वर्षांपूर्वीच हे अनधिकृत बांधकाम तोडण्याचे आदेश तत्कालीन महापालिका आयुक्तांनी दिले होते. मात्र, अद्यापही या अनधिकृत बांधकामावर कारवाई झाली नाहीये. शिवाय येत्या दोन दिवसांत प्रताप सरनाईक यांच्याविरोधात सर्वसामान्यांची फसवणूक केल्याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार देणार असल्याचेही सोमैया यांनी स्पष्ट केलं.

सोमैया यांच्या आरोपावरून प्रताप सरनाईक यांनी त्यांना खरमरीत उत्तर दिल आहे. “महापालिकेने हे मजले अनधिकृत असल्याची नोटीस काढल्यानंतर महापालिकेच्या लोकमान्य नगर येथील शाळा बांधून दिल्याने विकास हक्क हस्तांतरच्या (टीडीआर) मोबदल्यामध्ये मिळालेले चटईक्षेत्र वापरून तसेच दंड आकारून महापालिकेने मजल्यांना परवानगी दिलेली आहे. तसेच वापर परवाना (ओसी) मिळण्यास विलंब होत असला तरीही या बांधकामामध्ये चटईक्षेत्राचे उल्लंघन झालेले नाही. त्यामुळे अनधिकृत बांधकामाचा प्रश्न निर्माण होत नाही. सोमय्या यांनी आठ वर्षे जुने प्रकरण बाहेर काढून जाणीवपूर्वक बदनामीचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या अब्रूनुकसानीचा दावा करणार आहे. ”