Desh

सरकारने मंदी आहे हे मान्य करावे; प्रियंका गांधींची मोदी सरकारवर टीका

By PCB Author

September 18, 2019

नवी दिल्ली, दि. १८ (पीसीबी) – वाहन उद्योगावर ओढवलेल्या आर्थिक अरिष्टानंतर आता परदेशी गुंतवणुकीवरून काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. “सरकारने आधी मंदी आहे, हे मान्य करावे. देशातील परिस्थितीमुळे गुंतवणुकदार हादरले आहेत. केवळ परदेशात शो करून गुंतवणुकदार भारतात येणार नाही,” असे प्रियंका गांधी म्हणाल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘हाऊडी मोदी’ हा कार्यक्रम ह्युस्टनमध्ये २२ सप्टेंबर रोजी होणार आहे. मोदी यांच्या या कार्यक्रमावरून प्रियंका गांधी यांनी ट्विटरवरून मोदीवर निशाना साधला आहे. “झगमगाट दाखवून आणि रोज पाच ट्रिलियन- पाच ट्रिलियन म्हणाल्याने किंवा माध्यमांच्या हेडलाईन मॅनेज केल्याने आर्थिक सुधारणा होत नाहीत. परदेशात कार्यक्रम प्रायोजित करून गुंतवणुकदार येत नाही. गुंतवणुकदारांचा विश्वास डगमगला आहे. आर्थिक गुंतवणुकीची जमिनीचं भेगाळली आहे,” अशी टीका प्रियंका यांनी केली आहे.

दुसऱ्या ट्विटमध्ये प्रियंका म्हणाल्या, “इतक काही होत असताना भाजपा सरकार हे सत्याचा स्वीकार करत नाही. आर्थिक महाशक्तीच्या दिशेने जात असताना मंदीचा गतिरोधक लागला आहे. यात सुधारणा न करता झगमगाट काही कामाचा नाही,” असे प्रियंका म्हणाल्या.