Maharashtra

सरकारच्या विरोधात बोलणं म्हणजे देशद्रोह का ? – जावेद अख्तर

By PCB Author

September 28, 2020

मुंबई,दि.२८(पीसीबी) – ज्या कलाकारांनी सरकारविरोधात आवाज उठवला त्याच कलाकारांवर कारवाई का केली जातेय? सरकारविरोधात आवाज उठवणं म्हणजे देशद्रोह नव्हे, असं म्हणत प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी केंद्र सरकारवर टीका केलीये. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

सरकारविरोधात आवाज उठवणं म्हणजे देशाविरोधात भूमिका घेणं नव्हे. पण असा अजेंडा पद्धशीरपणे राबवला जातोय. भाजप सरकार येण्यापूर्वी लोक काँग्रेसवर टीका करायचे. आत्ताच्याच मंत्र्यांनी त्यावेळी काँग्रेसविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. पण त्यांना आपण देशद्रोही म्हटलं नाही, असं जावेद अख्तर म्हणालेत.

दरम्यान जावेद अख्तर यांनी दिलेल्या मुलाखतीत बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणावर भाष्य केलं. यावेळी बोलताना जावेद अख्तर यांनी केंद्र सरकारवर टीका करत एनसीबीच्या कारवाईवर संशय व्यक्त केला आहे.