“सरकारच्या बदल्यात रस्त्यावरचे लोक कायदे करू लागले तर…’ : मोदींच्या कृषी कायदे रद्द करण्याच्या निर्णयावर कंगना नाखूष

0
256

मुंबई, दि.१९ (पीसीबी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनही कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली. मोदी सरकारच्या या निर्णयावर अभिनेत्री कंगना रणौत नाराज आहे. कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय दुःखद आणि लज्जास्पद असल्याचे सांगून कंगना रणौतने मोदी सरकारचा हा निर्णय पूर्णपणे अन्यायकारक आहे, असे म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका वर्षाहून अधिक काळ वादात असलेले तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली आणि त्यासाठी संसदेच्या आगामी अधिवेशनात विधेयक आणले जाईल असे म्हटले आहे.

संसदेत निवडून आलेल्या सरकारच्या बदल्यात रस्त्यावरचे लोक कायदे करू लागले तर ते जिहादी राष्ट्र आहे. ज्यांना हे हवे होते त्या सर्वांचे अभिनंदन, असे कंगनाने आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे. देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, आम्ही शेतकर्‍यांना पटवून देऊ शकलो नाही, आमची तपश्चर्या कमी होती, त्यामुळे आम्हाला हा कायदा मागे घ्यावा लागला आहे.

सरकार सर्व प्रयत्न करूनही शेतकऱ्यांच्या एका भागाला तीन नवीन कृषी कायद्यांचे फायदे समजावून सांगण्यात अपयशी ठरले आहे. या तीन कृषी कायद्यांचा उद्देश शेतकर्‍यांचे विशेषत: लहान शेतकर्‍यांचे सक्षमीकरण आहे, असे पंतप्रधान म्हणाले. तीन कृषी कायद्यांचा संदर्भ देताना पंतप्रधान म्हणाले, “देशाच्या कानाकोपऱ्यातील करकरी शेतकऱ्यांनी, अनेक शेतकरी संघटनांनी त्याचे स्वागत आणि समर्थन केले आहे. आज मी त्या सर्वांचा खूप आभारी आहे.”
कंगनाने याआधी सरकारच्या कायदे आणण्याच्या निर्णयाचे समर्थन केले होते. अनेकदा शेतकऱ्यांच्या बाजूने असलेल्या दिलजीत दोसांझसारख्या इतर सेलिब्रिटींवर कंगनाने जोरदार टीका केली होती. शेतकर्‍यांना पाठिंबा दर्शवणाऱ्या रिहानाबद्दलही कंगनाने ट्विट केले होते.