Maharashtra

सरकारच्या अहंकारी स्वभावामुळे आपला देशच बुडायला नको – रोहित पवार

By PCB Author

December 03, 2019

मुंबई,दि.३(पीसीबी) – सरकारच्या अहंकारी स्वभावामुळे आपला देशच बुडायला नको, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी म्हटलं आहे. रोहित पवार यांनी एक फेसबुक पोस्ट करत केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

सध्या भीतीचं वातावरण आहे आणि लोक सरकारवर टीका करण्यास घाबरतात, असं राहुल बजाज यांनी म्हटलंय. यावरूनच फेसबुक पोस्ट करत रोहित पवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल बजाज यांच्यासारख्या ज्येष्ठ उद्योगपतींना सरकारची भीती वाटत असेल तर ही चिंताजनक बाब आहे, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

केंद्र सरकारमधील मंत्री सांगत आहेत त्याप्रमाणे बहुतेक तुम्ही चांगलं काम करत देखील असाल पण उद्योगधंद्यांची वस्तुस्थिती वेगळी आहे. उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनाच उद्योगधंद्यांच्या खऱ्या समस्या माहित आहे, असंही रोहित पवारांनी सांगितलं आहे.