Maharashtra

समृध्दी मार्गाला राजमाता जिजाऊ यांचे नाव द्या – अजित पवार

By PCB Author

January 20, 2019

बुलढाणा, दि. २० (पीसीबी) – समृध्दी मार्गाला राजमाता जिजाऊ यांचे नाव द्या, नाहीतर ही जनता तुम्हाला लोकसभा, विधानसभा निवडणुकीत पराभूत केल्याशिवाय राहणार नाही,  असे इशारा देऊन आघाडी सरकार सत्तेवर आल्यास या महामार्गास आम्ही राजमाता जिजाऊंचे नाव देऊ,  असे आश्वासन राष्ट्रवादीचे नेते  अजित पवार यांनी आज (रविवार) येथे दिले.

राष्ट्रवादीच्या वतीने  ”निर्धार परिवर्तनाचा” या यात्रेनिमित्त बुलढाणा जिल्ह्यातील वरवटबकाल येथील जाहीर सभेत ते बोलत होते.

या सरकारमध्ये मुस्लिम, कुणबी, माळी समाजापैकी एकालाही प्रतिनिधीत्व नाही. शिवाजी महाराज यांच्या अष्ठप्रधान मंडळात सर्व जाती जमातीचे लोक होते, मग शिवाजी महाराज यांचा आशिर्वाद घेणारे त्यांच्या विचारांचे पालन का करत नाही? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

मी पाणीपुरवठा खात्याचा मंत्री असताना येथील १४० गावांना स्वच्छ व चांगले पाणी देणारी योजना मंजूर केली, ती कार्यान्वित केली. आज मात्र बुलढाणा जिल्ह्यात टँकरची मागणी मोठ्या प्रमाणावर असताना तहसीलदारांना त्याच्या मंजूरीचे अधिकार देण्याऐवजी सरकारने केवळ वेळ घालविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार ठेवले आहेत,  असे पवार म्हणाले.