नवी दिल्ली, दि. २४ (पीसीबी) – समाजवादी पार्टीसोबत ‘महागठबंधन’ करणे आमची सर्वात मोठी चूक होती,असा खळबळजनक दावा बसपाच्या अध्यक्षा मायावती यांनी दिली आहे. मायावतींनी बसपा बैठकीत हे वक्तव्य केल्यानंतर बसपाचे नेते देखील आश्चर्यचकित झाले.
लखनऊमध्ये बसपाच्या बैठकीत मायावतींनी मुलायम सिंग आणि अखिलेश यादवांवर अनेक गंभीर आरोप देखील केले. यावेळी मायावतींनी अखिलेश यांच्या राजकीय विचारांवर देखील प्रश्नचिन्ह उभे केले.
लोकसभा निवडणुकीतील पराभवाला देखील मायावती यांनी अखिलेश यांनाच जबाबदार धरले आहे. ताज कॉरिडॉरच्या केसमध्ये मला अडकविण्यात भाजप आणि मुलायम सिंग यांचा हात असल्याचा आरोप देखील मायावतींनी यावेळी केला.
समाजवादी पक्षाने त्यांच्या प्रचारात आरक्षणाला विरोध केला होता. त्यामुळेच त्यांना दलित आणि मागासवर्गीयांनी मतं दिली नाहीत, असेही मायावती म्हणाल्या. बसपाचे प्रदेशअध्यक्ष आरएस कुशवाहा यांना सलीमपूरमधून समाजवादी पार्टीचे नेते राम गोविंद चौधरी यांनीच पराभूत केलं. त्यांनी समाजवादी पक्षाची मत भाजपकडे वळविली. मात्र तरीही अखिलेश यांनी कोणतीही कारवाई केली नाही, असा आरोप मायावती यांनी केला.