सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा; नेमके गौडबंगाल काय? – धनंजय मुंडे

0
516

मुंबई, दि. ११ (पीसीबी) – सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे राज्यात भीषण दुष्काळ असतानाही शेतकऱ्यांना   मदत देण्यात अडचणी येत आहेत, असे अप्रत्यक्षपणे राज्य सरकार  सांगत आहे. मात्र, दुसरीकडे सरकारने  आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा लावला आहे. हा नेमका काय गौडबंगाल आहे? असा सवाल राष्ट्रवादीचे नेते व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.

मुंडे यांनी ट्विट करून म्हटले आहे की, मुंबई महानगरपालिका आयुक्त अजॉय मेहता यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी बदली करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी आयुक्तपदी मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव प्रविण परदेशी यांची वर्णी लावली आहे. राज्याचे मुख्य सचिव युपीएस मदान यांना मुख्यमंत्र्याचे विशेष सल्लागार  केले आहेत. या अधिकाराऱ्यांच्या बदल्यांच्या पार्श्वभूमीवर मुंडे यांनी प्रश्न उभा केला आहे.

मुंबई मनपा आयुक्त अजॉय मेहता यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी बदली, मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव प्रविण परदेसी यांची बृहन्मुंबई मनपा आयुक्तपदी नियुक्ती. मुख्य सचिवांची सप्टेंबरपर्यंत मुदत असताना आचारसंहितेदरम्यान घाईघाईने निर्णय घेण्याची गरज का भासली? याचे  जनतेला उत्तर द्या, अशी मागणी मुंडे यांनी केली आहे.