औरंगाबाद, दि. १७ (पीसीबी) – स्वाभिमानी शेतकरी संघटनेमधून भाजपवासी झालेल्या व सध्या कडकनाथ कोंबडी घोटाळ्या प्रकरणातील राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा सामना करण्यासाठी माझे कार्यकर्ते पुरेसे आहेत, असा खोचक टोला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी लगावला.
औरंगाबाद येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चानंतर पत्रकारांशी शेट्टी बोलत होते. पीक विमा कंपन्यांनी सरकारची तिजोरी लुटली. स्वत: मुख्यमंत्र्यांना पीक विम्याचे घोटाळे दाखवून दिले. मात्र, कंपन्यांना जाब विचारण्याची हिंमत या सरकारमध्ये नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
यावेळी पत्रकारांनी शेट्टी यांना कडकनाथ कोंबडी प्रकरणी छेडले असता, मंत्री सदाभाऊ खोत यांचाच मुलगा त्यात आरोपी आहे. त्यामुळे याची चौकशी करावीच लागणार. अन्यथा ईडीच्या कार्यालयावर मोर्चा काढू, असे शेट्टी म्हणाले.