Maharashtra

सत्य बाहेर येईल म्हणून केंद्र सरकारने ‘एनआयए’कडे तपास दिला – शरद पवार

By PCB Author

January 25, 2020

पुणे,दि.२५(पीसीबी) – ‘एल्गार परिषद’ प्रकरणात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला होता. याची चौकशी करण्याची मागणी केल्यानंतर केंद्राने हे प्रकरण ‘एनआयए’कडे वर्ग केलं. त्यावरून शरद पवार यांनी मोदी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

“या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी तारतम्य बाळगलेलं नाही. त्यामुळे तपास होणं गरजेचं आहे. पण, त्यातून सत्य बाहेर येईल म्हणून या प्रकरणाचा तपास घाईघाईनं एनआयएकडे दिला,” असा आरोप पवार यांनी केला आहे.

पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेनंतर अर्बन नक्षलवादाचा ठपका ठेवत अनेक कार्यकर्त्यांना पुणे पोलिसांनी अटक केली होती. या संपूर्ण कारवाईवर शरद पवार यांनी संशय व्यक्त केला होता. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना याची चौकशी करण्याची मागणी केली होती. यासंदर्भात त्यांनी पत्र दिले होते. त्यानंतर काही तासातच केंद्र सरकारने एल्गार परिषद आणि भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास एनआयएकडे दिला. त्यावर शरद पवार यांनी आक्षेप घेतला आहे.

“या प्रकरणात पोलिसांनी कारवाई केल्यानंतर न्यायमूर्ती पी.बी. सावंत असं म्हणाले होते की, पोलिसांनी त्यांच्या नावे चुकीचं विधान केलं आहे. यात अनेकांवर केस करण्यात आल्या आहेत. चळवळीत काम करणाऱ्यांवर खटले भरले आहेत. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. त्यातून सत्य बाहेर येईल. म्हणून मी मुख्यमंत्र्यांनी पत्र लिहिल. एसआयटी नेमण्याची मागणी केली. हेच पत्र गृहमंत्र्यांनाही पाठवलं,” अशी माहिती पवार यांनी दिली.