सत्तेसाठी युती करणाऱ्या उध्दव ठाकरेंना लाज वाटत नाही का? – नारायण राणे

0
503

सिंधुदुर्ग, दि. १४ (पीसीबी) – शिवसेनेने गेली ५ वर्ष फक्त पंतप्रधान मोदींवर टीका केली. आता पुन्हा सत्तेसाठी शिवसेनेने युती केली आहे. उद्धव ठाकरे यांना लाज कशी वाटत नाही, असा जोरदार प्रहार  स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष व  खासदार नारायण राणे यांनी केला.

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी निलेश राणे यांच्या प्रचारासाठी कुडाळमधील माणगाव खोऱ्यात   जाहीर सभेचे आयोजन केले होते. यावेळी राणे बोलत होते.

यावेळी राणे म्हणाले की, नाणार मी घालवले, हे  म्हणतात की नाणार प्रकल्प यांनी घालवला. मच्छीमारांचा प्रश्न मी सोडवला, अरे बाबा तुला मासेमारी कशी करतात हे माहिती आहे का? असा सवाल करत शिवसेना खोटारडा पक्ष आहे. शिवसेना मराठी माणसाच्या हक्कासाठी काम करते, असे म्हणतात मग येथे कोण मद्रासी राहतात का? जिल्ह्यात आमदार, खासदार, पालकमंत्र्यांनी कोणती विकासाची कामे केली ती सांगावी, असे राणे यावेळी म्हणाले.

जिल्ह्यात विकासाची कामे करून देखील निवडणुकीत पडलो. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला पाडले. असे कधीही महाराष्ट्रात झालेले नाही. माझ्याइतकी  विकासाची कामे कुठल्याच मुख्यमंत्र्यांनी आपल्या जिल्ह्यात केलेली नाहीत, तितकी कामे मी करूनही निवडणुकीत पडलो, अशी खंत राणे यांनी  व्यक्त केली.