सत्ता हातात नसल्यान हा आटापीटा – आदित्य ठाकरे यांची विरोधकांवर टीका

0
332

मुंबई, दि. २७ (पीसीबी) – सत्ता हातात नसल्यान त्यांना अपचन होतेय. सत्तेसाठीच हा सर्व आटापीटा चाललाय… आणि याला डायजीन किंवा जेल्युसिल हेच चालू शकतं, अशा शब्दांत, मुख्यामंत्री उध्दव ठाकरे यांचे चिरंजीव आणि राज्यचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी विरोधांच्या टीकेचा समाचार घेतला.

राज्यात वाढणारा कोरोनाग्रस्तांचा आकडा, मुंबईतली कोरोनाची परिस्थिती आणि या सगळ्यातच राजकीय घडामोडींना सध्या आलेला वेग, या सगळ्याविषयी त्यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपल्या भावना व्यक्त केल्या.

राहुल गांधींनीचे विधान आणि त्यावर देवेंद्र फडणवीसांनी, बहुदा काँग्रेस कोव्हिडचं सगळं खापर उद्धव ठाकरेंच्या नावावर फोडण्याचा प्रयत्न असल्याच्या प्रश्नावर आदित्य ठाकरे म्हणाले, मी राजकीय वक्तव्यांवर जाणार नाही. काँग्रेसनी जी पत्रकार परिषद घेतली, ती सगळ्यांनी पाहिली. राज्य सरकारवर सगळ्यांचा विश्वास आहे, हे स्पष्ट झालंय. मुख्यतः मी विरोधी पक्षांना सांगेन की यामध्ये राजकारण न करता आपण सगळ्यांनी एकत्र काम करणं गरजेचं आहे. जसं देशात वातावरण आहे – कुठेही काही चुकीचं होत असेल तर आम्ही बोलत नाही, कारण विरोधी पक्ष असेल वा सत्ताधारी पक्ष असेल, आपण पक्षभेद विसरून आपण काम करणं गरजेचं आहे. लोकांची सेवा करणं गरजेचं आहे. कुठेही राजकीय मतभेद मध्ये न आणता एकमेकांची मदत करणं गरजेचं आहे. टीका-टिप्पणी तर होतच राहील. याच्यासाठी आपल्याकडे खूप वेळ आहे. पण आता लोकांचे जीव वाचवणं महत्त्वाचं आहे. कदाचित आपलंच एक राज्य आहे, जिथे विरोधी पक्ष अशा भावनेने काम करतोय जिथे महाराष्ट्र जर खाली गेला, जगाच्या मीडियात खाली दिसला तर त्यांना बरं वाटतं. जगात असं कुठेही होत नाहीये. ही खरंतर दुःखद घटना आहे. किंवा त्यांची ही भावना चुकीची आहे. मुख्यतः त्यामागचं एकच कारण आहे – सत्ता हातात नसल्याचं अपचन. आणि याला डायजीन किंवा जेल्युसिल हेच चालू शकतं.

मुंबईतली परिस्थिती हाताबाहेर गेलीय का या प्रश्नावर आदित्य ठाकरे म्हणाले, जागतिक साथीच्या आजारादरम्यान आपल्याला आकड्याला घाबरून चालणार नाही. या आकड्यांना आपल्याला सामोरं जावं लागेल. जेव्हा एखादी साथ असते तेव्हा तुम्ही आकडे किती ओळखता, त्या रुग्णांना शोधून त्यांना आयसोलेट करता, यात सरकारचं यश असतं. आकडे जेवढे वाढतील, तेवढे लवकर आपण पीकच्या जवळ जाऊ. तेवढ्या लोकांना आयसोलेट करू शकू आणि बरं करू शकू. कारण हा विषाणू एकामधून दुसऱ्यामध्ये प्रादुर्भाव होतो. जेवढे आकडे आपण ओळखू ते लोकांना दिसेल, पण तितक्यांना बरं करून आपण साथ आटोक्यात आणू शकू. दोन-तीन गोष्टी पाहायला हव्यात. आपल्याकडची सगळी हॉस्पिटल्स, मग ती सरकारी असोत वा खासगी, ही सध्या कोव्हिडवर उपचार करत आहेत. देशभरातल्या इतर सर्जरीज पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. आपल्याला जर या हॉस्पिटल्समधली कोव्हिड-19 खेरीज इतर कामं आणि उपचार सुरू करायचे असतील तर मग फील्ड हॉस्पिटल्समध्ये कोव्हिडच्या साथीचे उपचार करावे लागतील. या फील्ड हॉस्पिटल्समध्ये एक्स-रे, स्वॉब्जपासून ते ऑक्सिजन आणि ICU यासाठीची आपली तयारी सुरू आहे. काही ठिकाणी कोव्हिड डायलिसिसही सुरू आहे, कारण काही ठिकाणी डायलिसिससाठी गेलेली व्यक्ती कोव्हिड पॉझिटिव्ह आली आणि ती इमारत तीन दिवस बंद झाली. आणि इतरांना याचा त्रास होऊ शकतो. म्हणून आपण फील्ड हॉस्पिटल्स करतोय. म्हणजे हळुहळू इतर रोगांचे उपचार हॉस्पिटलमध्ये होतील आणि कोव्हिडवर फील्ड हॉस्पिटल्समध्ये उपचार होतील.

आम्ही राजकारणापासून दूर राहिलो आहोत. अधिकारी, मंत्री, कार्यकर्ते या सगळ्यांनाच लोकांची सेवा करायला सांगण्यात आलेलं आहे. जिथे जिथे आम्ही कमी पडतोय, तिथे लगेच आम्ही काम करायचा प्रयत्न करतोय. जिथे राजकारण होतंय, त्याच्यापासून दूर राहातोय.मला वाटतं, आता सगळ्यांचं काम एवढंच आहे की जिथे आपण चांगलं काही करू शकतो, ते आपण सोबत करूयात. एकमेकांना मदतीचा हात देऊयात. काही कमी पडत असेल तर नक्की दाखवून द्या. पण त्याच्यावरून राजकारण करणं अयोग्य आहे. मला वाटतं तुम्ही गॉसिपवर भरवसा ठेवू नका. मी सगळ्यांना एकच सांगेन – प्रत्येक मुंबईकरच काय, प्रत्येक देशवासीयासाठी आम्ही इथे आहोत. सेवा करत आहोत, अहोरात्र मेहनत करत आहोत. जे काही करायची गरज आहे, जे करणं शक्य आहे, ते दोन्ही आम्ही करतोय. सेवा करतच राहू आणि या युद्धात आपण जिंकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.