पिंपरी, दि. ११ (पीसीबी) – आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आरपीआयला दहा जागा मिळाव्यात, अशी मागणी केली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली आहे. तसेच जागा देण्याबाबत विचार करू, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे, अशी माहिती सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज (बुधवार) दिली.
पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील भीमसृष्टीचे उद्घाटन आणि माता रमाबाई आंबेडकर यांच्या पुतळ्याचे भूमिपूजन आठवले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.
आठवले म्हणाले की, ज्यांना सत्ता हवी आहे, त्यांनी माझ्याकडे यावे. सत्ता मिळवायची असल्यास महायुती हाच पर्याय आहे, असे सूचक विधान त्यांनी वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांची आघाडी तुटल्याच्या मुद्यावर केले.
राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधून अनेक नेते भाजप आणि शिवसेनेत येत आहेत. देशात आणि राज्यात केवळ भाजपचे सरकार येणार आहे. दुसऱ्या कुठलाही पक्षाची सत्ता येणे अशक्य आहे, हे सर्वांना माहित झाले आहे. महायुतीला २४० पेक्षा जास्त जागा मिळतील, असा विश्वास आठवले यांनी यावेळी व्यक्त केला.