मुंबई, दि. २१ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभांमधून पंतप्रधान मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यावर चौफेर हल्ला चढवल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेवर तोफ डागली आहे. शिवसेना हा लाचारीत घरंगळत गेलेला पक्ष आहे, अशी टीका राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत केली आहे.
सत्ता व पैशासाठी शिवसेना लाचार झाली आहे. त्यांची भाजपशी युती होणार हे मी आधीच सांगितले होते, असे राज म्हणाले. युती झाली नसती, तर शिवसेना फुटली असती, असा दावाही त्यांनी केला. एकमेकांवर प्रेम करणारे भाजप व शिवसेना हे पक्ष नसून कधी एकमेकांचा गळा घोटतो, अशी त्यांची स्थिती झाली आहे, असे ते म्हणाले.
काँग्रेस किंवा राष्ट्रवादीला मते द्या, असे मी आवाहन करत नाही. तर भाजप व त्यांचे मित्रपक्ष यांना मत देऊ नका. या दोघांना फायदा होऊ नये, हेच मी सांगत आहे, असे राज म्हणाले. २०१४ मध्ये मोदींच्या लाटेमध्ये अनेकजण निवडून आले. परंतु आता लाट अजिबात नाही. निवडणुकीचा माहोलही कुठे नाही. पाच वर्षांपूर्वी इतकी आश्वासने मोदींनी दिली त्याचे काय झाले, हे विचारणे आपले काम आहे, असे राज म्हणाले.