Maharashtra

सत्ता नसेल तर भाजपाचे नेते वेडे होतील – संजय राऊत

By PCB Author

November 25, 2019

मुंबई,दि.२५(पीसीबी) – भाजपकडे सत्ता नसेल तर नेते वेडे होतील. त्यांचं मानसिक संतुलन बिघडेल. यानंतर भाजप नेत्यांसाठी आम्ही वेड्यांची इस्पितळं बांधायला सांगू, अशी बोचरी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर केली आहे.

शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपावर टीकास्त्र सोडले. माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले, “अजित पवार यांना अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद आणि २० मंत्रिपद देण्याची ऑफर भाजपानं दिली असल्याची माहिती मी ऐकली आहे. पण, चंबळच्या डाकूंसारखी भाजपा वागत आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांना गुरगावमधील हॉटेलमध्ये डांबून ठेवण्यात आलं होतं. त्यांची सुटका करण्यात आली आहे.

बहुमत होतं तर दरोडेखोरी करण्याची गरज काय होती. भाजपाला आम्ही पुरून उरू. विश्वासदर्शक ठरावाच्यावेळी आमचा आकडा त्यांच्यापेक्षा दहाने जास्त असेल,” असं म्हणत राऊत म्हणाले, सत्ता गेल्यास भाजपाचे नेते वेडे होतील. पण, आमचं सरकार आल्यानंतर आरोग्यमंत्र्यांना सांगून वेड्याची रूग्णालये सुरू करू,” असा टोला राऊत यांनी लगावला.