सत्तास्थापन आणि शपथविधीबाबत राजभवनात चौकशी करा : शरद पवार

0
753

पुणे, दि.१६ (पीसीबी)- भाजपाचे आमदार जयकुमार गोरे हे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीला गेल्या असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. परंतु त्यानंतर शरद पवारांना याबाबत विचारलं असता आपल्याला याबाबत काहीही माहित नसल्याचं सांगितलं. तसंच राज्यातील शपथविधीबाबत बोलताना याबाबत राजभवनातच चौकशी करा, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.

राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून तीन आठवड्याचा कालावधी झाला आहे. यंदाची निवडणुक भाजपा आणि शिवसेना महायुतीमध्ये लढली. असं असतानाही मुख्यमंत्री आमचाच होणार, या वादामुळे भाजपा आणि शिवसेना सत्ता स्थापन करू शकली नाही. त्यानंतर अन्य पक्षही सत्तास्थापन करण्यात अयशस्वी ठरल्यानं अखेर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. त्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तीनही पक्ष सत्ता स्थापन करण्याच्या दृष्टीने एकत्रित आले आहे. त्या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसांपासून तिन्ही पक्षातील काही प्रमुख नेत्यांच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. त्यावरून लवकरच राज्याला महाशिवआघाडी पाहण्यास मिळेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

या सर्व घडामोडी घडत असताना, या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीत महत्त्वाची भूमिका बजावणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे आज पुण्यातील निवासस्थानावरून एका कार्यक्रमासाठी जात होते. त्यावेळी राज्यात केव्हापर्यंत सत्ता स्थापन होणार आणि शपथविधी होणार याबाबत विचारण्यात आला. यावर उत्तर देताना “मी दिल्लीला जात असून तुम्ही राजभवनला चौकशी करा,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. शरद पवार यांच्या, या भूमिकेमुळे राज्यात महाशिवआघाडीची सत्ता स्थापन करण्यास उशीर लागणार का असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.