Maharashtra

‘सत्ताधीशांचा वसुलीचा नादच खुळा’ म्हणत आशिष शेलारांची सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका’

By PCB Author

June 09, 2021

मुंबई, दि.०९ (पीसीबी) : मान्सून ने मुंबईत जोरदार हजेरी लावल्यानंतर मुंबईची थोड्याच वेळात तुंबई झाली आहे. पहिल्याच पावसात मुंबईची तुंबापुरी झाल्याने भाजपने शिवसेना आणि मुंबई महापालिकेवर जोरदार टीका केली आहे. ‘सत्ताधीशांचा वसुलीचा नादच खुळा, नेमेची येतो पावसाळा’, अशा काव्यमय शब्दात भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. तसेच महापालिकेत पाच वर्षात एक हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोपही आशिष शेलार यांनी केला आहे.

डेब्रीजच्या गोण्या जशाच्या-तशा नाल्यात
पावसाचे पाणी मुंबईकरांच्या घरात…
आणि मलाईच्या गोण्या मात्र
कंत्राटदारांच्या खिशात!

आता तरी मुंबईकरांची खरी काळजी करा!#MumbaiRainBMCFail pic.twitter.com/xcHpfL5t2h

— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) June 9, 2021

आशिष शेलार यांनी पहिल्याच पावसात मुंबई तुंबल्याने महापालिका आणि शिवसेनेला घेरलं आहे. शेलार यांनी ट्विट करून पालिकेच्या भ्रष्ट कारभारावरच बोट ठेवलं आहे. मुंबईत दरवर्षीप्रमाणे पाणी तुंबलंय. घरात पाणी घुसू लागलंय. नालेसफाई कधी 107% तर कधी 104% झाल्याच्या दाव्यांचे आकडे मोठे-मोठ्याने “वाझे”. पहिल्या पावसातच “कटकमिशन”चे सगळे व्यवहार उघडे पडले आहेत. मुंबईकर हो! सत्ताधीशांचा हा वसुलीचा नाद खुळा, नेमेची येतो पावसाळा… पाच वर्षांत 1 हजार कोटींचा घोटाळा, अशी काव्यात्मक टीका शेलार यांनी केली आहे. डेब्रिजच्या गोण्या जशाच्या-तशा नाल्यात, पावसाचे पाणी मुंबईकरांच्या घरात… आणि मलाईच्या गोण्या मात्र कंत्राटदारांच्या खिशात!, अशी टीका करतानाच आता तरी मुंबईकरांची खरी काळजी करा, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.