‘सगळं केंद्रानं करायचं आणि राज्यात आम्ही माशा मारायच्या आणि…’; ठाकरें सरकारची फडणवीसांकडून कानउघडणी

0
263

मुंबई, दि.१४ (पीसीबी) : महाराष्ट्र सरकारकडून ‘मराठा आरक्षण देणारा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरवल्यानंतर आता केंद्र सरकारकडून पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली असून त्यासोबतच केंद्रानं ५० टक्क्यांवरच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर देखील विचार करावा आणि याचिका करावी’, अशी मागणी करण्यात आली आहे. “सगळं केंद्रानं करायचं आणि राज्यात आम्ही माशा मारायच्या आणि मिळालेलं आरक्षण घालवायचं हे किती दिवस चालणार? अशोक चव्हाणांनी कायदा समजून आणि सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका कोण करू शकतं यासंदर्भात विचार करायला हवा. ५० टक्क्यांवरचं आरक्षण राज्याने दिलं होतं. त्यामुळे याविरोधात केंद्र सरकार कशी पुनर्विचार याचिका करेल?” असा सवाल देखील फडणवीस यांनी विचारत ठाकरे सरकारवरती बोचरी टीका केली आहे.

फडणवीस म्हणाले, “आपली असफलता लपवण्याकरता प्रत्येक गोष्ट केंद्राच्या माथी मारणारे हे लोक. मी केंद्राचं अभिनंदन करेन की इतक्या वेगानं केंद्रानं ही भूमिका मांडली. राज्य सरकार हे नौटंकीबाजीमध्ये लागलं आहे. तुम्हाला माहिती नाही का की गव्हर्नरच्या हातात काही नाही. एखाद्या समाजाला मागास घोषित करायचं असेल, तर इंदिरा साहानींचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने याही प्रकरणात गृहित धरला आहे. मागासवर्ग आयोग राज्याला निर्मित करावा लागेल. त्याला मराठा समाज मागास कसा आहे याची नव्याने कारणं द्यावी लागतील. कारण गायकवाड आयोगाने दिलेली कारणं न्यायालयाने रद्द ठरवली आहेत. त्याव्यतिरिक्तची कारणं देऊन तो अहवाल मंत्रिमंडळात मंजूर करावा लागेल. त्यानंतर तो केंद्र सरकारकडे पाठवावा लागेल. त्यानंतर केंद्रीय मागासवर्ग आयोगाकडे तो जावा लागेल. कोणतीही भूमिका घ्यायची नाही. टाईमपास करायचा आणि केवळ सरकारकडे सगळं ढकलायचं. लोकांनाही कळतंय कोण कसं वागतंय ते”, असं ते म्हणाले.

“केंद्राची ही भूमिका पहिल्या दिवशीपासून होती की हा सगळा अधिकार राज्याचा आहे. १०२व्या घटनादुरुस्तीवेळी केंद्रानं हे स्पष्ट केलं होतं. असं असतानाही सर्वोच्च न्यायालयात न्यायाधिशांमध्ये दुमत झालं. दोन न्यायाधिशांनी राज्याचे अधिकार मान्य केले, तर दोन न्यायाधिशांनी समाजाला मागास घोषित करण्याचे अधिकार केंद्राकडे असल्याचं सांगितलं. यासंदर्भात केंद्रानं पुनर्विचार याचिका दाखल केली आहे”, असं फडणवीसांनी यावेळी सांगितलं.