संस्था चालवायच्या असतात, लुटायच्या नसतात – अजित पवार

0
438

अहमदनगर, दि. २३ (पीसीबी) – अहमदनगर : ‘राष्ट्रवादी काँग्रेस सोडून गेलेल्या अनेकांच्या काही चुका झालेल्या आहेत. त्या झाकण्यासाठी त्यांनी पक्षांतर केले आहे. सहकारी संस्था चालवायच्या असतात, लुटायच्या नसतात याचे भानही अनेकांना राहिले नाही,’ अशी टीका राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी अकोले येथील सभेत केली. त्यांचा रोख राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या पिचड पिता-पुत्रांकडे होता.

या सभेत पवार यांनी पिचड यांच्यासह पक्ष सोडून गेलेल्या इतर नेत्यांवरही टीका केली. सरकारच्या कारभाराचाही त्यांनी समाचार घेतला. अकोले मतदारसंघात सर्वांनी एकत्र येऊन पिचड यांना झटका देण्याचे आवाहन त्यांनी केले. ते म्हणाले, ‘स्थानिकांचा विरोध डावलून आम्ही पिचड पिता-पुत्रांना पक्षात मानाचे स्थान दिले. राज्यातील आणि सहकारी संस्थांमधील महत्वाची पदे दिली. तरीही त्यांनी पवारांचा विश्वासघात केला. त्यांच्या ताब्यातील साखर कारखाना असो की इतर संस्था, तेथे काय चालते याची माहिती आहे. संस्था चालवायच्या असतात, लुटायच्या नसतात, याचे भान ठेवले पाहिजे. आपल्या चुका झाकण्यासाठी राजे, नेते, सेनापती सोडून गेले आहेत. त्यांना जाऊ द्या, आता नवीन पिढी आणि महिलांना संधी देण्यात येत आहे. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, हे दाखवून देण्यासाठी अशा लोकांच्या विरोधात आता सर्वांनी एकत्र यावे.’